


सूत श्रोत्यांना म्हणाले अशा प्रकारे शिवउपासना सर्वश्रेष्ठ आहे जे सतत शिवनामाचा जप करतात त्यात सदा रममाण असतात ते शिवपदाला प्राप्त होतात. ऍका तुम्हाला मी एका शिवभक्ताची कथा सांगतो. एक नामदेव नावाचा महाज्ञानी आपल्या अंगाला भस्म लावून सदा दिगंबर अवस्थेत एकटाच अरण्यात संचार करीत असे. सतत शिवनामस्मरण व आत्मज्ञानचर्चा याव्यतिरीक्त तो काहीही बोलत नसे. हा प्रती शंकराचा अवतारच आहे असे लोकांना वाटे. एकदा एकटाच अरण्यात संचार करीत असता भूकेने व्याकूळ झालेल्या ब्रह्मराक्षसाने नामदेवाला पाहिले व खाण्यासाठी पकडले तेव्हा नामदेवाच्या अंगाचे पवित्र भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले त्याबरोबर त्याची आसुरीवृत्ती जावून सर्व पापाचा रास झाला पूणीत होऊन दिव्यरूप झाला व पूर्वी जन्माचे स्मरण ही झाले. तेव्हा त्यांने नामदेवाचे चरण धरले व हे सर्व तुमच्या कृपेने (स्पर्शान) झाले आहे. त्यायोगे मी पावण झालो आहे. असे म्हणून मी तुमच्याशी बोललो म्हणजे नक्की मला शिवपदाची प्राप्ती होईल अशी माझी परम श्रद्धा आहे याचे कारण पुर्णजन्मीचे ज्ञान तुमच्या दर्शनानेच झाले आहे. असे म्हणून त्याने मागील पंचवी जन्मीकोण होतो ते सविस्तर नामदेवाला सांगितले. पुढे नामदेवाच्या अंगाच्या भस्माचा स्पर्श होताच तो यमलोकी न जाता शिवलोकी गेला याविषयी एक मृत ब्राह्मण प्रेताची कथा सांगितली व भस्म महिमा ही सांगितला त्यायोगे तो राक्षस कैलासाला गेला. सूत पुढे श्रोत्यांना म्हणू लागले सज्जन हो ! सत्संगतीचा महिमा अघाद आहे ज्याचा जसा भाव असतो, तसा त्याला तो लाभ प्राप्त होतो. सूताने दुसरी कथा सांगितली. पांचाळदेशाचा राजासिंहकेतुचा एकदा अरण्यात शिकारीला गेला त्याबरोबर काही भिल्लही होते. शिकार शोदार्थ हिंडत असता त्यांना पडके शिवालय दिसले त्या मंदिरात एक भिल्ल गेला असता एक सुंदर शिवलींग दिसले. त्याने राजाला दाखविले राजाने त्याची मनोभावे सेवा करावी लागती भिल्लाने कबूल केले व सेवा कसी करावी विचारले, राजाने दरोज चिदा भस्म लावून नैवद्य दाखवावा असे सांगितले. भिल्लाने ते शिवलिंग घरी आणून योग्य स्थापना केली व दररोज नवे चिदाभस्म आनुन पत्नीसह नैवद्य दाखवून श्रद्धेने पूजा करू लागला. त्याची शंकराने परिक्षा घेतली. चिदाभस्म कोठेही मिळाले नाही. शिवपूजा खंडीत होईल म्हणून त्याचे पत्नीने स्वयंपाक करून स्वतः जाळून घेतले ते भिल्लाने भस्म घेवून नेमाप्रमाणे पूजा केली. व नेहमी प्रमाणे पत्नीला नैवद्य दाखव म्हणून सांगितले तेंव्हा खरोखर पत्नी तेथे नैवद्य घेवून आली हे पाहून आश्चर्य वाटले दोघांनीही यथासांग पुजा करून शंकराला नमस्कार केला अशाप्रकारे शिवउपासनेचा अगाध महिमा आहे. ते दोघेही शिवकृपेने शिवपदास प्राप्त झाले हे पाहून शिवकेतूराजाने श्रद्धेने शिवनामस्मरण करून तोही शिवलोकी गेला.
श्रीगणेशाय नमः ।। जेथें शिवनामघोष निरंतर ।। तेथें कैंचे जन्ममरण-संसार ।। तिहीं कळिकाळ जिंकिला समग्र ।। शिवशिवछंदेंकरूनियां ॥१ ॥ पाप जळावया निश्चितीं ।॥ शिवनामीं आहे ज्याची आसक्ती ।। त्यासी नाहीं पुनरावृत्ती ।। तो केवळ शिवरूप ॥ २ ॥ जैसें प्राणियाचें चित्त ।। विषयीं गुंतलें अत्यंत ।। तैसें शिवनामीं होतां रत ।। तरी बंधन कैंचें तयां ॥ ३ ॥ धनइच्छा धरूनि चित्तीं ।। धनाढ्याची करिती स्तुती ।। तैसे शिवनामीं प्रवर्तती ।। तरी जन्ममरण कैंचें तयां ॥४॥ राजभांडारीचें धन ॥ साधावया करिती यत्न ।। तैसें शिवचरणीं जडलें मन ॥ तरी संकट विघ्न कैंचें तयां ॥ ५ ॥ धन्य ते शिवध्यानीं रत ।। येचिविषयीं कथा अद्भुत ॥ नैमिषारण्यीं सांगत ।। सूत शौनकादिकांप्रती ।।६।। वामदेव नामें महाज्ञानी ।। शिवध्यानीं रत विचरे काननीं ।॥ एकाकी निर्माय शांत दांत जनीं ।॥ त्रिविधभेदरहित जो ॥७॥ दिशा जयाचें अंबर ॥ भस्मचर्चित दिगंबर ॥ निराहार निरंतर ।॥ एकालाचि हिंडतसे ॥८।।
श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. जिथे शिवनामाचा सतत घोष चालतो, तिथे जन्म, मरण, संसार आणि त्याचे भय-चिंता हे काही राहात नाही. कारण ज्याने शिवनामाचा ध्यास घेतला आहे अशा पुण्यवान जीवास कळिकाळाचे भयच नसते. ।।१।। आपल्या पापांची निवृत्ती व्हावी म्हणून ज्यांनी शिवनामाची आसक्ती मनी धरली आहे, जो त्यातच रमला आहे, तो तर शिवरूपच झालेला असतो. ||२|| जसे माणसाचे चित्त हे विषयात गुंतले की, त्यास अन्य गोष्टीची आठवण राहात नाही. तसेच जर ते या पवित्र शिवनामात गुंतले तर त्यास कशाचे बंधन असणार? ।।३।। जशी धनाची अपेक्षा धरून धनवंताची स्तुती केली तर धनप्राप्ती होते; तद्वत इथे तर शिवनामाची कास धरल्यास जन्ममरणाचा फेरा हा चुकतोच. ||४|| राजाच्या धन भांडारातील धन मिळविण्यासाठी जसे काही लोक प्रयत्न करतात, तसे शिवकृपेसाठी त्याच्या चरित्रात मन रंगविले तर मग संकटे, विघ्ने ह्यांची चिंता म्हणून राहातच नाही.।।५।। जे मनुष्यप्राणी हे अशा पावन शिवनामात दंग असतात ते खरोखरच धन्य होत. नैमिषारण्यात सूत शौनकादिकांना म्हणतात की, आता मी तुम्हास यासंदर्भात एक कथा सांगतो. ॥६॥ सतत शिवनामात आणि ध्यानात मग्न असलेला वामदेव नावाचा एक महाज्ञानी मनुष्य हा महावनात फिरत असे. तो शांत, उपाधिरहित, अन् त्रिविध तापरहित होता. ।।७।। दिशा हेच त्याचे वस्त्र होते. तो दिगंबर अवस्थेत सर्वांगी भस्मविलेपन करून राहात असे. तो अनेकदा निराहार राही अन् एकटाच सर्वत्र फिरत असे. ।।८।।
काय करावें कोठें जावें ॥ काय घेवोनि काय त्यजावें ।। विश्व शिवमय आघवें ।॥ खेद मोह भेद नाहीं ॥९॥ अक्रोध वैराग्य इंद्रियदमन ॥ क्षमा दया कृपा समान ।। निर्लोभ दाता भय शोक मान ॥ काळत्रयीं न धरीच ॥१०॥ गृहापत्यदारावर्जित ।। कोणी एक परिग्रह नाहीं सत्य ॥ काया-वाचा-मनोदंडयुक्त ।। मौनी न बोले इतरांसीं ।। ११ ।। ज्ञानचर्चा शिवस्मरण ।। त्याविण नेणेचि भाषण ।। या नांव बोलिजे मौन ।। भेदाभेदरहित जो ॥१२॥ सर्वांच्या अनुग्रहास्तव ।। तें स्वरूप धरोनि विचरे शिव ॥ जडजीव तारावया सर्व ॥ विचरे सृष्टीं स्वइच्छे ॥१३॥ कार्याकार्य सारूनि कारण ।। आत्मस्वरूपीं पावला समाधान ।। देहत्रयरहित विधिनिषेधहीन ।। प्रवृत्तिनिवृत्तीवेगळा ॥१४॥ निरंकुश जो निःसंग ॥ जैसा ब्रह्मारण्यों विचरे मातंग ॥ तयाची रीति अभंग ॥ वेदशास्त्रं वर्णिती ॥१५॥ तो स्वरूपीं सदा समाधिस्थ ।। गगन तेंही अंगासी रुतत ।। म्हणूनि तेंही परतें सारीत ।। हेतुदृष्टांतवर्जित जो ॥१६॥ तेणें तेजाचें दाहकत्व जाळिलें ।॥ उर्वीचें कठिनत्व मोडिलें ॥ चंचलत्व हिरोनि घेतलें ॥ प्रभंजनाचें तेणें पैं ।॥१७॥
त्यास काय करावे, कोठे जावे, ह्याची कसलीच चिंता नसे. तो सर्व विवंचनारहित केवळ शिवध्यानातच मग्न असे. त्याला कसलाच मोह, माया किंवा लोभ म्हणून नव्हता. ।।९।। त्याला वृत्तींचे पूर्ण वैराग्य लाभले होते, इंद्रियांचे दमन साध्य झाले होते. त्याचे ठायी दया, क्षमा, शांती पूर्ण होती. त्याला भय, चिंता, खेद, मोह कसा तो म्हणून माहीतच नव्हता. ।।१०।। घरदार, मुले, प्रपंच ह्या सगळ्यापासून दूर असणारा तो मनुष्य कोणाकडून काहीही घेत नसे. तो नित्य मौनावस्थेतच असे. तो काया-वाचा मनानेदंड घेत असे. कोणाशीही न बोलता सदैव मौनातच राहणे त्यास पसंत असे. ।।११।। केवळ ज्ञानमय चर्चा करावी, मौन बाळगावे, अशा प्रवृत्तीचा तो होता. त्याच्या मनात कोणताच भेदाभेद नव्हता. ||१२|| जणूकाही सर्वांवर सारखाच अनुग्रह करता यावा म्हणून तो भगवान शिवच त्याच्या रूपाने अवतरला होता जणू. ।॥१३॥ आवश्यक त्या कृती करून आणि अनावश्यक कृर्तीचा त्याग करून तो सतत आत्मस्वरूपातच मग्न असे. त्याला देहाचे भान नव्हते. तो वृत्ती आणि निवृत्तीच्याही पलीकडच्या अवस्थेत गेलेला होता. ।।१४।। तो ब्रह्मारण्यात फिरणाऱ्या हत्तीसारखा निसंग आणि स्वच्छंद होता. त्याच्या या ाच्या या वृत्तीचे वेदशास्त्रेही कौतुक करीत, त्याची प्रशंसा करीत.।।१५।। तो सतत स्व-समाधीत रमलेला असे. त्याच्या त्या अवस्थेत बाधा येऊ नये म्हणून आकाशही त्याच्या जवळ येत नसे. तो सर्व प्रकारच्या हेतूंपासून पूर्णतः अलिप्त होता. ।।१६।। जणूकाही त्याने अग्नीची दाहकता, पृथ्वीची कठोरता आणि पवनाचे चंचलत्व हेच हिरावून घेतले होते. ।।१७।।
आर्द्रत्व पूर्ण निरसोन ।। धुवोनि शुद्ध केलें जीवन ।॥ एवं पिंडब्रह्मांड जाळून ।। भस्म अंगीं चर्चिलें ॥१८॥ ऐसा तो अमूर्तामूर्त ॥ केवळ ।। केवळ शुक कीं जडभरत ।। क्रौंचारण्यीं विचरत ।। सर्वही देखत शिवरूप ।।१९।। तों एक ब्रह्मराक्षस धांवत ।। महाभयानक शरीर अद्भुत ।। कपाळीं शेंदूर जिव्हा लळलळित ।। भयानक मुखाबाहेरी ॥ २० ॥ खदिरांगार तैसें नेत्र ।। बहुत जीव भक्षिले अपरिमित ।। क्षुधित तृषित पापी कुपात्र ।।॥ अकस्मात पातला ॥ २१ ॥ महाहिंसक सर्वभक्षक । तेणें वामदेव देखिला पुण्यश्लोक ।। धांवोनियां एकाएक ॥ कंठीं घालीत मिठी त्याच्या ॥ २२ ॥ लोह परिसासीं झगटतां पूर्ण ॥ तत्काळ होय दिव्य सुवर्ण ॥ तेवीं त्याच्या अंगस्पर्शेकरून ।। मति पालटली तयाची ॥२३॥ ।। वामदेवांगींचें भस्म ।। त्याच्या अंगी लागलें उत्तम ॥ सत्त्ववृत्ति झाली परम ।। असुरभाव पालटला ॥ २४॥ आपुल्या अंगीं झगटोन ॥ उद्धरला पिशिताशन ।। हें त्यासी नाहींच भान ।। समाधिस्थ सर्वदा ॥ २५ ॥ नेणें सुखदुःख शीतोष्ण ॥ लोक निंदिती कीं वंदिती पूर्ण ॥ शरीरीं भोग कीं रोग दारुण ।॥ हेंही नेणें कदा तो ॥ २६ ॥
त्याने स्वतःतील जलतत्त्वाचा ओलावाही नष्ट करून स्वतःस स्वच्छ केले होते. त्याने पिंड ब्रह्मांडाची होळी करून त्याचे भस्म सर्वांगी लावले होते. ।।१८।। असा तो सर्वांपासून पूर्ण अलिप्त असलेला जीव एकटाच कौंचारण्यात फिरत असे. सर्व सृष्टी ही त्या शिवरूपी योग्यास पाहात असे. ।।१९।। एकदा एक महाभयानक ब्रह्मराक्षस त्याच्या दिशेने पुढे आला. त्या राक्षसाने कपाळी शेंदूर लावलेला होता, तो अक्राळविक्राळ होता, त्याची जिव्हा मुखाबाहेर लळलळत होती. ।। २० ।। त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते. त्याने आजवर अनेक निरपराध जीवांची हत्या केली होती, त्यांचे रक्त-मांस भक्षण केले होते. तरीही तो नेहमीच भुकेला आणि रक्त-मांसाला लाचावलेला ब्रह्मराक्षस त्या वामदेवाच्या पुढे अचानकपणे आला. ।॥२१॥ त्या नरभक्षकाने वामदेवास समोर पाहताच तो त्याचे भक्षण करण्यासाठी पुढे झाला. त्याने एकाएकी धावत जाऊन वामदेवाच्या गळ्यास मिठी घातली. ।।२२।। त्याबरोबर लोह आणि परिसाची भेट झाल्यावर जसे एका क्षणात त्या लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणेच वामदेवाच्या अंगाचे भस्म हे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागताच त्याच्या सर्व तामसी वृत्ती एका क्षणात बदलून गेल्या. ।।२३।। वामदेवाच्या अंगीचे भस्म त्या राक्षसाच्या अंगास लागताच त्याच्या वृत्तीत परिवर्तन घडले. तामसी वृत्तीचे सात्त्विक वृत्तीत परिवर्तन घडले. त्याच्या बुद्धीचा एका क्षणात पालट झाला. ।।२४।। पण इकडे वामदेवास मात्र आपल्या अंगीच्या भस्मस्पर्शाने एका ब्रह्मराक्षसाच्या वृत्ती पालटल्या आहेत, त्याचा उद्धार झाला आहे या कशाचेच भान नव्हते. तो त्याच्याच स्वानंदात मग्न होता. ।।२५।। त्यास सुख, दुःख, उष्ण, शीत ह्याची कशाचीच जाणीव नव्हती. त्याला लोकनिंदा काय किंवा स्तुती काय सारखीच होती. शरीरात भोग किंवा रोग काही आहेत ह्याची तो दखल घेतच नसे. ।।२६।।
मी हिंडतो देशीं कीं विदेशीं । हेंही स्मरण नाहीं त्यासी ।। तो ब्रह्मानंद सौख्यराशी ।। विधीनिषेधीं स्पर्शेना ।। २७ ।। ऐसा तो योगींद्र निःसीम ।। त्याच्या अंगस्पर्शे पापें झालीं भस्म ।। दिव्यरूप होवोनि सप्रेम ।। चरणीं लागला तयाच्या ॥ २८ ॥ सहस्रजन्मींचें झालें ज्ञान ।। त्यासी आठव झाला संपूर्ण ।। मानससरोवरीं उदकपान ।। करितां काक हंस होय ॥ २९ ॥ कीं हाटकनदीतीरीं देख ।। पडतां पाषाण काष्ठादिक ॥ दिव्य कार्तस्वर होय सुरेख ।। तेवीं राक्षस पैं झाला ॥ ३० ॥ कीं करितां सुधारसपान ।। तेथें सहजचि आलें देवपण ।। कीं शशिकिरणस्पर्शेकरून ।। द्रवे जैसा चंद्रकांत ॥ ३१ ॥ कीं रवि उगवतां निःशेष ।। निशा सरे प्रकटे प्रकाश ।। तैसा उद्धरला राक्षस ।। स्तवन करी तयाचें ॥ ३२ ॥ म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण ।। मी तव दर्शनें झालों पावन ।। तुजसीं करितां संभाषण ।। वाटतें पावेन शिवपदा ॥३३॥ मज सहस्रजन्मींचें झालें ज्ञान ।। परी पंचवीस जन्मांपासून ।। पापें घडलीं जीं दारुण ।। तीं अनुक्रमें सांगतों ॥३४॥ पूर्वी मी राजा दुर्जय ।। यौवनमदें अति निर्दय ।। परम दुराचारी होय ।। ब्राह्मण प्रजा पीडित ॥३५॥
आपण कोठे संचार करतो आहोत ह्याचेही त्यास भान राहात नसे. तो आपल्याच ब्रह्मानंदावस्थेत देहभान विसरून सर्वत्र संचार करीत असे. त्यास कोणत्याच विधिनिषेधाचा लवलेश नसे. ।। २७ ।। तो एक उच्च अवस्थेतला स्वानंदी योगी होता. उलट त्याच्या अंगस्पर्शाने त्या राक्षसाची मात्र सारी पापे जळाली होती. त्या ब्रह्मराक्षसास आता एक नवा दिव्य देह प्राप्त झाला होता ।। २८ ।। त्यास आता त्याच्या गत सहस्रजन्मांचे ज्ञान झाले होते. त्यास स्मृतीचे वरदान मिळाले होते. त्याची अवस्था म्हणजे मानस सरोवराचे पाणी पिताच कावळ्याचा राजहंस व्हावा तशीच झाली होती. ।। २९ ।। किंवा सुवर्णमयी नदीत पडलेले पाषाण, काष्ठे ही जशी सोन्याची होतात तसा तो राक्षस आता उद्धरला होता. ||३०|| अमृताच्या लाभाने अमरत्व प्राप्त होते किंवा चंद्रप्रकाशाने चंद्रकांत मणी द्रवतो. ॥३१॥ किंवा उगवत्या सूर्यनारायणाच्या आगमनाबरोबर रात्र संपून जाते, त्याप्रमाणेच त्या वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला. ।।३२।। तेव्हा मोठ्या कृतज्ञतेने तो ब्रह्मराक्षस वामदेवास हात जोडून म्हणू लागला, “हे गुररुवर्या, तुझ्या दर्शनाने, स्पर्शाने मी पावन झालो आहे. आता मला असे वाटते की, तुझ्याशी काही संवाद जर साधता आला तर त्या तुझ्या बोधाने मी शिवपदास नक्कीच जाईन.” ।।३३।। हे महान योगीराजा, मला खरंतर तुझ्यामुळे माझ्या सहस्रजन्मांचे ज्ञान झाले आहे, तरी त्यातील शेवटच्या पंचवीस जन्मांतील माझा पापपुण्याचा हिशेब मी तुला देतो. ||३४|| असे म्हणून तो ब्रह्मराक्षस सांगू लागला की, पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. तारुण्याच्या मस्ती आणि अंगातल्या रगीमुळे मी नाहक अनेकांशी दुराचारी पद्धतीने वागलो, मी अनेक निर्दयी कृत्ये केली. मी माझ्या नगरीतील विप्र आणि प्रजाजनांस फार त्रास दिला. ।।३५।।
प्रजेसी नित्य करीं मार ।। आवडे तैसा विचरें स्वेच्छाचार ।। वेद पुराण शास्त्र ।। कैसें आहे मी नेणें ।॥ ३६ ॥ स्वप्नींही नेणें कदा धर्म ।। ब्रह्महत्यादि पापें केलीं परम ।। नारी अपूर्व आणून उत्तम ।। नित्य नूतन भोगीं मी ।। ३७ ।। ऐशा स्त्रिया असंख्य भोगून ॥ बंदीं घालूनि केलें रक्षण ।। सर्व देश धुंडोन ।। स्त्रिया नूतन आणवीं ॥ ३८ ॥ एकदां भोग देऊन ।। दुसऱ्यानें तिचें न पाहें वदन ।। त्या बंदी रडती आक्रंदून ।। शाप देती मजलागीं ॥३९॥ विप्र पळाले राज्यांतून ॥ पट्टणें ग्रामें खेटकें जाण ।। इतुकींही धुंडोन ।। स्त्रिया धरून आणिल्या ॥ ४० ॥ भोगिल्या तीन शतें द्विजनारी ।। चार शतें क्षत्रियकुमारी ।। वैश्यस्त्रिया सुंदरी ।। दहा शतें भोगिल्या ॥ ४१ ॥ शूद्रांच्या सहस्र ललना ।। चांडालनारी चार शतें जाणा ।। त्यावरी अपवित्र मातंगकन्या ।। सहस्र एक भोगिल्या ॥ ४२ ॥ चर्मककन्या पांचशत ।। रजकांच्या चार शतें गणित ।। वारांगना असंख्यात ।। मिती नाहीं तयांतें ।॥ ४३ ॥ पांच शतें महारिणी ।। तितुक्यात वृषली नितंबिनी ।। यांवेगळ्या कोण गणी ॥ इतर वर्ण अष्टादश ॥४४॥ इतुक्या कामिनी भोगून ।। तृप्त नव्हे कदा मन ।। नित्य करीं मद्यपान ।। अभक्ष्य तितुकें भक्षिलें ।॥४५।।
मी माझ्या प्रजेस नाहक मारहाण करीत असे, मला वेद-शास्त्र-धर्म कशास म्हणतात ते माहीत नव्हते. ।। ३६।। मी कंधी स्वप्नातही धर्मानुसार आचरण केले नाही. मी ब्रह्महत्येसारखी घोर पातकेही केली होती. मी नित्य नव्या स्त्रीचा उपभोग घेत असे. ||३७|| मी असंख्य खिया भोगून वर त्यांना बंदीवासात टाकत असे. वेगवेगळ्या देशांतून सुंदर सुंदर स्त्रिया आणायच्या आणि त्यांचा मनसोक्त भोग घ्यायचा ही माझी आवड होती. ।।३८ ।। मी एकदा भोगलेली स्त्री पुन्हा भोगत नसे किंवा तिचे तोंडही पाहात नसे. अशा स्त्रियांना मी बंदिशाळेत कोंडत असल्याने त्या मला अनेक शाप देत.।।३९।। माझ्या अन्यायास घाबरून अनेकांनी माझे राज्य सोडले. विप्र राज्य सोडून गेले. जेव्हा माझ्या नगरीत मला स्त्रिया मिळेनात तेव्हा मी नजिकच्या गावातून शोध घेऊन स्त्रिया आणून त्यांचा उपभोग घेत असे. ।।४० ।। मी जवळजवळ तीनशे ब्राह्मण, चारशे क्षत्रीय आणि दहाशे वैश्यस्त्रिया भोगल्या. ।।४१।। हजार शूद्र, चारशे चांडाळणी आणि असंख्य मातंगिनी स्त्रियांचा मी उपभोग घेतला. ।।४२।। तसेच पाचशे चांभारणी, चारशे धोब्यांच्या स्त्रिया आणि असंख्य वारांगना व गणिका या मी किती भोगल्या ह्याची तर गणतीच नाही. ।।४३।। पाचशे महारणी, तेवढ्याच रखेल्या, अठरापगड जाती जमातीतील असंख्य वनिता मी भोगल्या. ।।४४।। इतक्या स्त्रियांचा भोग घेऊनही माझ्या विषयवासनेची तृप्ती मात्र झाली नव्हती. त्यातच भर म्हणूनच की काय, मी मद्यपान आणि मांसाहारासारख्या निंद्य गोष्टीही करीत असे. ।।४५।।
ऐसे भोगिता पापभोग ।। मज लागला क्षयरोग ।। मृत्यु पावलों सवेग ।। कृतांतदूत धरोनि नेती ।।४६ ।। यमपुरीचें दुःख अपार ।। भोगिले म्यां अति दुस्तर ।। तप्त ताम्रभूमी त्यावर ।। मजलागीं चालविलें ।।४७ ।। लोहस्तंभ तप्त करून । त्यासी नेऊनि देवविती आलिंगन ।। माझें घोर कर्म जाणून ॥ असिपत्रवनीं हिंडविती ॥४८ ॥ कढईत तेल झालें तप्त ।। त्यांत नेऊनि बुडवीत ॥ तोंडीं घालिती नरक मूत्र ।। पाप बहुत जाणोनी ।।४९ ।। महाक्षार कटुरस आणोनी ॥ मुखीं घालिती पासलें पाडुनी ॥ तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी ॥ नेत्र फोडिती एकसरें ॥५०॥ कुंभीपाकीं घालोनि शिजविती ॥ कर्णी तप्त लोहदंड दडपिती ।। अहा तेथींची जाचणी किती ।। सांगों आतां गुरुवर्या ॥५१॥ तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण ।। त्यांत पचविती कित्येक दिन । मांस तोडिती सांडसेंकरून ॥ वरी शिंपिती क्षारोदक ।। ५२ ।। जिव्हा नासिक आणि कर्ण ।। तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदून ।। हस्त पाद खंडून ॥ पोट फोडिती क्रूर शस्त्रे ॥५३॥ अंगाचा काढिती भाता ॥ तप्त शस्त्रं रोविती माथां ।। शिश्न छेदूनि गुदद्वारीं अवचितां ।। तप्त अर्गळा घालिती ।।५४ ।। सर्वांगासी टिपऱ्या लावून ।। सवेंचि करिती पाशबंधन ।। पृष्ठीकडे वांकवून ।। चरणीं ग्रीवा बांधिती ।॥५५॥
या सर्व पापाचरणाची शिक्षा म्हणूनच की काय, पण मला क्षयरोगाची बाधा झाली आणि त्यातच माझा मृत्यू झाला. मला यमदूतांनी यमलोकी नेले. ।।४६।। त्या यमपुरीत मला अत्यंत क्लेश भोगावे लागले. मला यमदूतांनी तप्त तव्यावर चालविले. ||४७|| लोखंडी तापलेल्या खांबास मिठ्या मारायला लावल्या. माझ्या घोर पापी-दुराचारी कर्माची शिक्षा म्हणून मला तलवारीच्या पात्यांच्या रानात हिंडविले. ||४८|| यमदूतांनी मला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. माझ्या तोंडात विष्ठा भरविली, तर मला मूत्र पाजले. ।।४९|| त्यांनी मला कधी खारद, कधी तिखद कधी आंबट असे रस पाजले. तीक्ष्ण चोचीच्या गिधाडांनी येऊन माझे डोळे फोडले. ।॥५०॥ त्यांनी मला कुंभीपाकी घालून शिजविले. लोखंडाच्या तप्त सळ्या माझ्या कानात घुसविल्या. माझी अतिशय छळवणूक केली. ती काय आणि किती सांगू? ।।५१।। कधी त्यांनी मला रक्तकुंडात, तर कधी रेतकुंडात मुरत ठेवले. त्यांची लोखंडी सांडशीने माझ्या अंगाची सालडी काढून त्यावर मिठाचे पाणी शिंपडले।।. ५२।। कधी त्यांनी माझ्या अंगास दाभण टोचले, तर कधी हातपाय साखळदंडांनी बांधून घातले. ।॥५३॥ तसेच अंगाची साल काढणे, तप्त धारदार शत्रे अंगी खुपसणे, लिंग छेदणे, गुदद्वारात सळ्या खुपसणे अशा अघोरी शिक्षाही त्यांनी मला दिल्या. ।।५४|| सर्वांगास सुया टोचत, दाभण खुपसत, पाठीवर वाकवून पायी बेड्या अडकवीत.।।५५।।
बोटीं बोटीं सुया रोवून ।। पाषाणें वृषण करिती चूर्ण ।। हस्तपायीं आणून ।। पाषाणबेडी घालिती ।।५६ ।। सहस्र वर्षे न लगे अंत ।। ऐशिया नरकीं बुडवीत ॥ एक येवोनि पाडिती दांत ।। पाश घालिती ग्रीवेसी ॥५७॥ आपलीं विष्ठामूत्र ॥ बळेंच भक्षविती यमदूत ।। सर्वेच अंगाचे तुकडे पाडीत ।। दोष अमित जाणोनी ।।५८ ।। श्यामशबल श्वान लावून ।। चरचरा टाकिती फाडून ।। एक शिरास्थि काढिती ओढून ।। एक मांस उकरिती ॥ ५९ ॥ लोहार्गळा उष्ण तीव्र ।। पृष्ठीं हृदयीं करिती मार ।। उखळीं घालोनि सत्वर ।। लोहतप्तमुसळें चेंचिती ॥ ६० ॥ तीक्ष्ण औषधींचे रस आणिती ।। नासिकाद्वारें आत ओतिती ।। सवेंचि वृश्चिककूपीं टाकिती ।। बहुत विपत्ती भोगिल्या ॥ ६१ ॥ ज्यांचें विष परम दुर्धर ।। ऐसे अंगासी डसविती विखार ।। अग्निशिखा लावोनि सत्वर ।। हें शरीर भाजिले ॥ ६२ ॥ अंतरिक्ष असिधारे बैसवून ।। पायीं बांधिती जड पाषाण ।। सवेंचि पर्वतावरी नेऊनी ।। ढकलूनि देती निर्दयपणें ॥ ६३ ॥ आंतडीं काढून निश्चितीं ।॥ ज्याचीं त्याजकडोन भक्षविती ॥ ऊर्ध्व नेवोनि टांगिती ।। आपटिती क्रोधभरें ॥६४॥ लोहकंटकीं उभे करून ।। करिती इंगळांचें आंथरूण ।। मस्तकीं घालूनियां पाषाण ।। फोडोनि टाकिती मस्तक ॥ ६५ ॥ लोहचणक करूनि तप्त ।। खा खा म्हणोनि दूत मारीत ॥ ओष्ठ धरोनि फाडीत ।। तप्त सळ्या नाकीं खोंविती ।। ६६ ।।
हातापायाच्या बोटांत सुया खुपसत. पायात दगडी बेड्या ठोकीत. ।।५६।। अनेक वर्षे नरकात बुडवून ठेवीत. कोणी दात पाडीत तर कोणी गळ्यात फास आवळत.।॥५७॥ यमदूत माझीच विष्ठा आणि मूत्र मला खाऊ घालीत अन् पाजीत. कधी अंगाचे तुकडे करीत. ।।५८ ।। त्या यमपुरीतील कुत्री अंग फाडून खात. कोणी कवटी फोडीत, तर कोणी मांसाचे लचके काढीत. ।।५९।। तापलेल्या सळईने मारीत, उखळात घालून चेचून काढीत. ।।६०।। कधी जहाल औषधे पाजीत, तर कधी विंचू इंगळ्या ह्यांच्या कूपात लोटीत. गुरूराया, अरे ह्या आणि अशा त-हेच्या अनंत जीवघेण्या यातना मी त्या यमपुरीत भोगल्या रे.।।६१।। अत्यंत विषारी असे प्राणी अंगास डसवीत. आगीवर डोके भाजून काढीत. ।।६२।। धारदार शस्त्रावर अडकवून पायी जड दगड बांधीत. कधी तलवारीच्या टोकावर चालवीत, तर कधी डोंगरावरून ढकलून देत. ।।६३।। कधीकधी तर शिक्षा म्हणून आपलीच आतडी काढून ती खायला लावीत. कधी वर फेकीत तर कधी आपटून मारीत. ।।६४।। लोखडी खिळ्यांवर उभे करीत, खाली इंगळ्यांचे अंथरूण तयार करीत. कधी डोक्यावर दगड फोडीत. ।।६५।। लोखंडाचे तप्त चणे खायला लावीत, ओठ फाडून सोलून काढीत, तप्त सळ्या नाकीकानी घुसवीत.।।६६।।
उफराटें टांगून ।। ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ।। रीस व्याघ्रादिक आणोन ।। विदारिती त्यांहातीं ।॥६७ ।। गजपदाखालीं चूर्ण ।। करविती तप्तनीरप्राशन ।। अष्टांगें कर्वतून ।। वेगळालीं टाकिती ।। ६८ ।। भयानक भुतें भेडसाविती ।। लिंग छेदूनि खा म्हणती ।। सांधे ठायीं ठायीं मोडिती ।। तीक्ष्ण शस्त्रेकरूनियां ॥६९॥ भूमींत रोवोनियां शरीर ॥ करिती बहुत शरमार ।। सवेंचि शूळ परम तीव्र ।। त्यावरी पालथें घालिती ॥७०॥ वरी मारिती मुसळघायें ।॥ मग पाषाण बांधोनि लवलाहें ।। नरकवापींत टाकिती पाहें ।। अंत न लागे उतरतां ॥ ७१ ॥ कांचा शिसें यांचा रस करून ।। बळेंचि करविती प्राशन ।। तेथें जात नाहीं कदा प्राण ॥ यातना दारुण भोगितां ॥७२॥ ऐशा तीन सहस्र वर्षेपर्यंत ।। नरकयातना भोगिल्या बहुत ।। त्यावरी मज ढकलोनि देत ।। व्याघ्रजन्म पावलों ॥ ७३ ॥ दुसरे जन्मीं झालों अजगर ।। तिसरे जन्मीं वृक भयंकर ॥ चौथे जन्मीं सूकर ॥ सरडा झालों पांचवा ॥७४॥ सहावे जन्मीं सारमेय सबळ ।। सातवे जन्मीं शृगाल ।। आठव्यानें गवय विशाळ ॥ गुरुवर्या मी झालों ॥७५ ।। नववे जन्मीं मर्कट प्रसिद्ध ।। दहावे जन्मीं झालों गर्दभ निषिद्ध ।। त्यावरी नकुळ मग वायस विविध ।। तेरावे जन्मीं बक झालों ॥ ७६ ॥
उफराटे टांगून मानेस दगड बांधीत. वाघ, सिंह, अस्वले ह्यांना बोलावून अंगावर सोडीत व फाडून खायला घालीत. ।। ६७|| कधी हत्तीच्या पायी देत, तर कधी उकळते पाणी पाजीत. कधीकधी अष्टांगे करवतीने लाकूड कापावे तशी कापून काढीत. ।। ६८ ।। भयानक भुतांची भीती दाखवीत.. लिंग छेवून खायला लावीत. तीक्ष्ण शस्त्राने अंगी वार करीत. शस्त्रांचे आघातकडून सांधे तोडीत. ।।६९।। कधी जमिनीत गाडीत, वर बाणांचा वर्षाव करीत, तर तापलेल्या तीक्ष्ण सुळावर चढवीत. ।।७०।। मुसळाचा मार, नरकात घालणे अशा शिक्षा करीत. ।। ७१|| कधी निर्दयीपणे काचेचा, शिशाचा तप्त रस प्यायला लावीत. या अशा दारुण यातना भोगत असतानाही प्राण म्हणून काही जात नसे आणि त्यातून सुटका होत नसे. ||७२ || अशाप्रकारे जवळजवळ तीन हजार वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्या यमदूतांनी मला वाघाच्या जन्मास घातले. ।। ७३ ।। त्यानंतर दुसऱ्या जन्मी अजगर, तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुक्कर, तर पाचव्या जन्मी मी सरडा झालो. ॥७४॥ सहाव्या जन्मी कुत्रा, सातव्या जन्मी कोल्हा, आठव्या जन्मी तर मी रानगवा झालो. ॥७५।। त्यानंतर माकड, गाढव, मुंगूस, कावळा होत होत तेराव्या जन्मात मी बगळा झालो.।।७६।।
चौदावे जन्मीं वनकुक्कुट ।॥ त्यावरी गीध झालों पापिष्ठ ।। मग मार्जारयोनी दुष्ट।। मंडूक त्यावरी जाणपां ॥७७॥ अठरावे जन्मीं झालों कूर्म ।। त्यावरी मत्स्य झालों दुर्गम ॥ सवेंचि पावलों मूषकजन्म ।। उलूक त्यावरी झालों मी ॥ ७८ ॥ बाविसावे जन्मीं वनद्विरद ।। त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ।। मग दुरात्मा निषाद ।। आतां राक्षस जन्मलों ॥ ७९ ॥ सहस्रजन्मींचें ज्ञान ।। झालें स्वामी मज पूर्ण ।। तव दर्शनाच्या प्रतापेंकरून ।। पावन झालों स्वामिया ॥८०॥ गंगास्नानें जळे पाप ।। अत्रिनंदन हरी ताप ।। सुरतरु दैन्य अमूप ।। हरीत दर्शनेंकरूनियां ॥ ८१ ॥ पाप ताप आणि दैन्य ।। संतसमागमें जाय जळून ।। यावरी वामदेव योगींद्र वचन ॥ बोलता झाला तेधवां ॥८२॥ एक विप्र होता महाअमंगळ।। शूद्रस्त्रियेसीं रतला बहुत काल ।। तिच्या भ्रतारें साधूनि वेळ ।। जिवें मारिलें द्विजातें ॥ ८३ ॥ ग्रामाबाहेर टाकिलें प्रेत ।। कोणी संस्कार न करीत ।। तों यमदूतीं नेला मारीत ॥ जाच बहुत भोगीतसे ॥८४॥ इकडे शिवसदन उत्तम ।। त्यापुढें पडिलें असे भस्म ।। महाशिवरात्रिदिवशीं सप्रेम ॥ भक्त पूजना बैसले ॥८५॥ त्या भस्मांत श्वान सवेग ।। येऊनि बैसलें पाहे शिवलिंग ।। भस्मचर्चित त्याचें अंग ।। जात मग त्वरेनें ।॥८६ ।।
चौदाव्या जन्मात रानकोंबडा, पंधराव्यात गिधाड, सोळाव्यात मांजर, सतराव्यात बेडूक झालो.।। ७७|| अठराव्या जन्मी कासव, एकोणीसाव्या जन्मी मासा, विसाव्या जन्मी उंदीर एकविसाव्या जन्मी घुबड झालो. ।। ७८ ।। बाविसावा जन्म हा मला रानहत्तीचा मिळाला. तेविसावा उंद, चोवीसावा पारधी आणि पंचवीसाव्या जन्मी मी राक्षस झालो. ॥७९॥ हे गुरुराया, हे असे मला माझ्या सहस्र जन्माचे ज्ञान झाले आहे. त्यातल्या गत पंचवीस जन्मांचा इतिहास हा असा आहे. या जन्मात मात्र तुझ्या दर्शनाने आणि अंगीच्या भस्मस्पर्शाने मी पावन आणि पवित्र झालो आहे. ।।८० ।। ज्याप्रमाणे गंगास्नानाने पाप नाश पावते, चंद्राच्या शीतल प्रकाशाने ताप दूर होतो, कल्पवृक्षामुळे दारिद्र्याचे हरण होते, तसे हे घडले आहे. ।।८१।। सत्संगाने भव, भय, ताप, पाप कसे दूर होते? त्यावर तो शिवयोगी त्या ब्रह्मराक्षसास म्हणाला, आता मी काय सांगतो ते ऐक. ||८२।। एक ब्राह्मण होता, पण तो अत्यंत अमंगळ आणि पापी व दुराचारी होता. तो सतत एका शूद्र स्त्रीशी रत असे. ही गोष्ट त्या स्त्रीच्या पतीस माहीत होती, तो लक्ष ठेवून होता. एकदा त्याने त्या ब्राह्मणास ते निंद्य कर्म करताना रंगेहाथ पकडले आणि संधी साधून त्यास जीवे मारले. ।।८३ ।। त्याने त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. त्या ब्राह्मणाच्या प्रेतावरही कोणतेच अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्याला यमदूत हे मारत मारत घेऊन निघाले. ।।८४ ।। इकडे काय झाले की, गावातील एका शिवालयासमोर भस्म पडलेले होते. महाशिवरात्र पर्वानिमित्ताने लोक शिवाचे पूजन. भजन करीत होते. ।।८५।। तेवढ्यात कुठून तरी एक कुत्रे तिथे आले. ते त्या भस्मावरच बसले. त्याने समोरची पूजा पाहिली, शिवलिंग पाहिले आणि ते सर्वांगास भस्म लागलेले कुत्रे तिथून निघून गेले. ।।८६।।
पडिलें होतें विप्रप्रेत ।। त्यावरी गेलें अकस्मात ।। कुणपास भस्म लागत ।। पापरहित झाला तो ।।८७।। तो यमदूतर्ती नरकांतूनि काढिला ।। शिवदूतीं विमानीं वाहिला ।। कैलासासी जावोनि राहिला ।। संहारिला पापसमूक ।।८८ ।। ऐसें हैं पवित्र शिवभूषण ।। त्याचें न वर्णवे महिमान ।। राक्षस पुसे कर जोडून ।। भस्ममहिमा सांगा कैसा ॥८९ ॥ भस्म कोणतें उत्तम ।। शिवभक्तीं लावावें कैसा नेम ।। यावरी वामदेव उत्तम ।। चरित्र सांगे शिवाचें ॥९० ॥ मंदरगिरी परमपवित्र ।। उंच योजनें अकरा सहस्र ।। त्यावरी एकदां त्रिनेत्र ।। देवांसहित पातला ॥ ९१ ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ।। चारण पिशाच गुह्यक समग्र ।। देव उपदेव पवित्र ।। महेशा वेष्टूनि बैसलें ॥ ९२ ॥ मरुद्गण पितृगण समस्त । एकादश रुद्र द्वादशादित्य ॥ अष्ट वसु अष्ट भैरव सत्य ॥ अष्ट दिक्पाळ पातले ॥९३॥ अठ्ठयाऐंशीं सहस्र ऋषीश्वर ।। साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ।। पाताळनाग पृथ्वीचे नृपवर ।। शंकरा वेष्टित बैसलें ॥९४ ।। विष्णु विधि पुरंदर ।। शिवध्यान पाहती समग्र ।। भुतांचे मेळे अपार ।। मंदराचळीं मिळाले ॥९५ ॥
गावाबाहेर आलेले ते कुत्रे नेमके जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते, तिथे आले. तिथे त्या कुत्र्याने आपले अंग झटकताच त्याच्या अंगावरचे भरम त्या प्रेतावर पडले आणि त्या भस्माने तो जीव पापरहित झाला. ||८७ || शिवदूतांनी त्यास नरकातून काढला आणि दिव्य विमानात बसवून शिवलोकी नेले. केवळ भस्माच्या स्पशनि त्याच्या पापाच्या अनंत राशी जळून भस्मसात झाल्या आणि त्यास कैलासपद प्राप्त झाले. ।।८८|| हे राक्षसा, अरे शिवभस्माचे माहात्म्य हे असे महान आहे. त्याचे वर्णन करता रता येत नाही. तेव्हा त्या ब्रह्मराक्षसाने त्या वामदेवास भस्म महिमा काय? ते सांगा अशी विनंती केली. ।।८९|| तसेच त्याने शिवभक्ती कशी करावी? शिवाचे कोणते भस्म हे अधिक उत्तम असेही विचारले. तेव्हा वामदेव त्यास शिवचरित्राचा काही भाग सांगू लागले. ||२०|| अकरा हजार योजने उंच आणि अत्यंत पवित्र असलेल्या अशा मांदारगिरी नावाच्या पर्वतावर एकदा भगवान शिव हे अनेक देवदेवतांच्या सह येऊन बसले. ||९१|| त्यावेळी यक्ष, किन्नर, गंधर्व, देवदेवता, उपांग देवता, तसेच प्रचंड मोठा भूतगणही तिथे जमला होता आणि देवांचे देव महादेव ते त्यांच्यात बसले होते. ।। ९२|| त्यावेळी तिथे मरुगण, पितृगण, अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, अष्ट भैरव आणि दिक्पाल हे सर्वजण आले होते. ।॥९३॥ त्यांच्या सोबत अठ्ठयाऐंशी हजार ऋषी, साठ हजार वालखिल्य, तिन्ही लोकींचे राजे हे शिवाभोवती बसले होते. ।।९४।। तिन्ही देवतांच्या सह इंद्रादिक देव त्या समीप बसलेल्या शिवाचे ध्यान करीत होते. ।।९५।।
सिंधुरवदन वीरभद्रकुमार ॥ साठ कोटि गण समग्र ॥ पुढें विराजे नंदिकेश्वर ॥ दुसरा मांदार शुभ्र दिसे ॥९६ ।। तेथें आले सनत्कुमार ।। साष्टांग करूनि नमस्कार ।। स्तवन करूनि अपार ।। विभूतिधारणविधी पुसती ॥९७॥ यावरी बोले जाश्वनीळ ॥ विभूति जाणा तेचि निर्मळ ॥ शुद्ध करूनि गोमयगोळ ।। मृत्तिकाकणविरहित ॥९८॥ ते वाळवूनि उत्तम ॥ मग करावें त्यांचें भस्म ॥ शुद्ध विभूति मज परम ।। शिवगायत्रीनें मंत्रिजे ॥९९ ॥ आधीं अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व ।। मग मस्तकाभोंवतें वेष्टिजे शुद्ध ।। तर्जनी न लाविजे निषिद्ध ।। कनिष्ठिका वेगळी करावी ॥१००॥ दों बोटांनीं लाविजे भाळीं ।। अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी ॥ ऐसें त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी ।। सनत्कुमारां सांगत ॥१०१॥ तर्जनी न लावितां सर्वांगीं विभूती । त्रिबोटीं लाविजे निश्चितीं ।॥ येणें महत्पापें भस्म होती ।। शिवभूषणप्रसादें ॥१०२॥ अगम्यागमन सुरापान । ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षण ।। महत्पापांचे पर्वत जाण ॥ भस्मचर्चनें भस्म होती ॥ १०३ ॥ ऐसा भस्माचा महिमा वामदेव ।। ब्रह्मराक्षसा सांगे सर्व ।। विमान आलें अपूर्व ।। दिव्यरूप असुर झाला ॥१०४॥
त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेल्या गणेश, नंदी, कार्तिकय आणि वीरभद्र ह्यांच्या मुळे तो देवभक्त मेळा शोभून दिसत होता. ।।९६ || तेवढ्यात तिथे सनत्कुमारांचे आगमन झाले. त्यांनी भक्तिभावे शिववंदना करून शिवस्तुती गाऊन महादेवांना विभूती धारणेचा विधी काय? आणि कसा असतो हे विचारले. ।।९७।। तेव्हा त्यास उत्तर देताना शिव म्हणाले, भस्म म्हणजे मातीरहित गोमय जाळून त्याची केलेली रक्षा. ती अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि पवित्र मानावी. ।।९८।। गायीच्या शेणाचा गोळा हा चांगला वाळवून, तो पवित्र अग्नीत जाळून त्याची केलेली रक्षा म्हणजे पवित्र विभूती. ती मला अत्यंत प्रिय आहे. शिव गायत्री मंत्राचा जप करीत उपासकाने ते भस्म अंगी धारण करावे. ।।९९।। आधी अंगठ्याने कपाळावर सरळ उभे भस्म लावावे. मग दोन बोटांनी आडव्या रेषा काढाव्यात. तर्जनी किंवा करंगळीचा वापर करू नये. ।।१००।। बोटांनी दोन आडव्या भस्मरेषा व अंगठ्याने उभी भस्मरेषा काढावी. भस्म हे या प्रकारे कपाळी धारण करावे, असे महादेवानी सनत्कुमारांना सांगितले. ।।१०१।। तर्जनीचा वापर न करता सर्वांगास विभूती लावली असता त्या शिवभूषणाने अनंत महत्पापे जळून भस्म होतात. ।।१०२।। केवळ भस्म लेपनाने अगम्यागमन, सुरापान, ब्रह्महत्या, गोहत्या, अभक्ष्यभक्षणसारखी मोठी पापेही जळून राख होतात. ।।१०३।। या आणि अशाप्रकारचा हा भस्म महिमा वामदेव हे त्या ब्रह्मराक्षसास सांगत असतानाच तिथे एक दिव्य विमान आले. इकडे त्या राक्षसाचा देहही अत्यंत दिव्यरूपात परिवर्तित झाला. भस्माच्या स्पर्शाने आणि दिव्य देह प्राप्तीच्या लाभाने शिवस्वरूप झालेला तो ब्राह्मराक्षस त्या विमानात घालून शिवदूतांनी कैलासास नेला. ।।१०४।।
कैलासाप्रति जाऊन ।। राहिला शिवरूप होऊन ।। वामदेव पृथ्वीपर्यटन ।। स्वेच्छे करीत चालिला ॥१०५॥ सत्संगाचा महिमा थोर ।। वामदेवसंगें तरला असुर ।। भस्मलेपनें भालनेत्र ।। सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥१०६॥ मंत्र तीर्थ द्विज देव ॥ गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ॥ येथें जैसा धरिती भाव ।। सिद्धि तैसी तयांसी ।।१०७।। पांचाळदेशीं नृपनाथ ॥ नाम जयाचें सिंहकेत ॥ जैसा शक्रनंदन कीं तृतीय सुत ।। पृथादेवीचा पुरुषार्थी ॥१०८॥ मृगयेसी गेला तो भूपाळ ॥ मागें चालत धुरंधर दळ ॥ शबरांचेही मेळ ॥ बहुसाल निघती तयासवें ॥१०९॥ वनोवनीं हिंडतां भूपाळक ॥ शबर एक परम भाविक ॥ भग्न शिवालय एक ॥ गेला त्यांत निषाद तो ॥ ११०॥ उन्मळोनि पडलें दिव्य लिंग ॥ पंचसूत्री रमणीय अभंग ॥ सिंहकेतरायातें सवेग ॥ दाविता झाला तेधवां ॥१११॥ राजा म्हणे लिंग चांगलें ।॥ परी पाहिजे भावें जिलें ॥ उगेंचि देवार्चन मांडिलें ॥ दंभेंकरूनि लौकिकीं ॥११२॥ लौकिकीं मिरवावया थोरपण ।। तिमा ठेविल्या सोज्ज्वळ करून ॥ जेवीं कासारें मांडिलें दुकान ।। प्रतिमाविक्रय करावया ॥११३॥
त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार होऊन तो कैलास पर्वतावर गेला. तर इकडे वामदेव हा शिवयोगी लोककल्याणासाठी आपल्या पुढील भ्रमंतीसाठी निघून गेला. ।।१०५|| श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की, सत्संगाचा महिमा हा थोर आहे. वामदेवाच्या संगतीने पापी, दुराचारी ब्रह्मराक्षसाचेही उद्धरण झाले. जे भक्त आदराने भस्म धारण करतात त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात. ।।१०६।। मंत्र, तीर्थ, देवता, गुरू, ब्राह्मण, यज्ञ, ज्योतिष आणि औषध ह्याव ह्यावर ज्याची जशी अन् जेवढी श्रद्धा असेल त्यानुसार त्यास त्याची फलप्राप्ती होते. ।।१०७|| यासंदर्भात आता आता आणखी एक कथा सांगतो. पांचाळ देशाचा एक सिंहकेत नावाचा राजा होता. तो राजा म्हणजे जणूकाही इंद्राचा पुत्र किंवा कुंतीचा तिसरा पुत्र अर्जुनच जणू. ।।१०८।। हा राजा अनेकदा वनात शिकारीस जात असे. तेव्हा त्याच्या सोबत सैन्य आणि काही भिल्लांच्या टोळ्या याही शिकारीस जात. ।।१०९|| एकदा राजा आणि मिल मंडळी ही रानावनात शिकार शोधीत असताना एक भिल्लु तिथल्या एका भग्न शिवालयाच्या जवळ आले. ||११०|| तेव्हा शवर नावाच्या त्या भिल्लास तिथे खाली पडलेले, पण अभंग आणि अत्यंत चांगले असे एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजा सिंहकेत यास दाखविले. ||१११|| ते लिंग पाहून राजा त्या भिल्लास म्हणाला, “हे शिवलिंग पूजनासाठी फार चांगले आहे. पण त्याचे पूजन हे भक्तिभावाने आणि अपार श्रद्धेने करायला हवे. त्यात वरवरचा देखावा किंवा नाटकीपणा नसावा. ||११२|| उगाच चारचौघांत नाव मिरवण्यासाठी ही भक्ती नसावी, नाहीतर या मांडलेल्या देवप्रतिमा आणि कासाराने मांडलेले त्याचे दुकान ह्यात काहीच फरक राहात नाही. ।।११३।।
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध ॥ यात्रेत हिंडती जैसे मैंद ॥ कीं मार्गघ्न वाटेंत साधुसिद्ध ।। वेष धरूनि बैसले ।।११४।॥ काळनेमी साधुवेष धरून ।। वाटेंत बैसला करावया विघ्न ।। एवं भावेंवीण देवतार्चन ।। व्यर्थ काय दांभिक ॥ ११५ ॥ शबरासी म्हणे नृपसत्तम ॥ तुज हें लिंग सांपडलें उत्तम ।। निषाद म्हणे पूजनक्रम ।। कैसा आहे सांग पां ॥११६॥ विनोदें बोले नृपवर ।। पूजेचे आहेत बहुत प्रकार ॥ परी चिताभस्म पवित्र ।। नित्य नूतन आणावें ॥११७॥ चिताभस्मावीण ॥ नैवेद्य करूं नये समर्पण ॥ हेंचि मुख्य वर्म जाण ।। शैवलक्षण निष्ठेचें ॥११८ ॥ नृपवचन मानूनि यथार्थ ॥ शबर लिंग घरा आणीत ।। शबरीस सांगे वृत्तांत ।। हर्षभरित ते झाली ॥११९॥ सुमुहूर्तं शिवलिंग स्थापून ।। दोधें पूजिती एकनिष्ठंकरून ।। चिताभस्म नित्य नूतन ।। आणिती मेळवून साक्षेपें ।॥१२०॥ एकार्ती होतांचि सुंदरी ।। नैवेद्या आणीत झडकरी ॥ उभयतां जोडल्या करीं ।। शिवस्तवनीं सादर ॥१२१॥ ऐसें नित्य करितां पूजन ।। लोटले कित्येक दिन ।। त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण ॥ केलें नवल पंचवदनें ॥ १२२ ॥
वरवरचा ब्राह्मणाचा वेश करून चोर, लुटारूंनी यात्रेत घुसावे, साधूंचा वेश घेऊन वाटमारी करावी, असा भक्तीचा दांभिकपणा असू नये. ।।११४।। लोकांना मारण्यासाठी, त्यांना लुबाडण्यासाठी वाटेत दबा धरावा, वर साधूचा वेश करावा, अशी ढोंगी, दांभिक भक्ती काय कामाची ती शुद्ध आणि निर्मळ हवी.”।।११५।। असे बोलून राजा त्या भिल्लास म्हणाला, बाबारे, तुला हे शिवलिंग सापडले ही फार भाग्याचीच गोष्ट आहे. त्यावर तो मिल राजास म्हणाला, हे राजा, तू मला या शिवलिंगाचे पूजन कसे करावे ते सांग.”।।११६।। त्यावर राजा विनोदाने म्हणाला, “मित्रा, अरे पूजेचे तर अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे चिताभस्माने केलेले शिवपूजन. ।।११७।। या पूजेत शिवास नैवेद्य त्या चिताभस्मासहच अर्पण करावा, अन्यथा अर्पण करू नये. तसेच हे चिताभस्म नित्य नूतन असावे.” ।।११८।। या प्रकारे राजाने शिव चिताभस्म पूजेची जी माहिती सांगितली, ती ऐकून तो शबर नावाचा भिल्ल ते शिवलिंग मोठ्या भक्तिभावाने आपल्या घरी घेऊन आला. त्याने तो पूजाविधी आपल्या पत्नीसही सांगितला. ||११९।। त्यानंतर त्या दोघांनी एका चांगल्या मुहूर्तावर त्या शिवलिंगाची घरात स्थापना करून ती चिताभस्म पूजा ते दोघे मोठ्या एकनिष्ठेने करू लागले. त्यासाठी नित्य नूतन चिताभस्म आणू लागले.।।१२० ।। शबराचे शिवपूजन पूर्ण होताच तो हाक द्यायचा आणि त्याची पत्नी भस्माबरोबर नैवेद्यही आणून द्यायची. मग दोघे ते अर्पण करून शिवाची मनोभावे स्तुती करीत. ।।१२१|| हे असे त्याचे श्रद्धायुक्त शिवपूजन मोठ्या नेटाने चालली असताना एके दिवशी त्या दोघांची परीक्षा पाहण्याच्या हेतूने भगवान शिवांनीच एक अघटित घडवून आणले. ।।१२२।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Aathava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.