श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (६) | Shree Shivleelamrut Adhyay Sahava (6)

Shree Shivleelamrut Adhyay Sahava
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Pachava

याठिकाणी सूत श्रोत्यांना सोमवार शिवव्रताचे महात्म्य सांगतात त्याविषयी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्यास अनेक पूत्र असून एकच मुलगी होती. तिचे नांव सिमंतिनी होते. ती राज्याची फार आवडती होती तीची जन्मपत्रीका काढली त्यावेळी ती राजलक्ष्मी होऊन पृथ्वीचे दहा हजार वर्षे राज्य योग होता. परंतु चौदाव्या वर्षी तीला वैधव्य येणार होते हाही योग दर्शवीत होता. हे ऐकून राजा चिंता युक्त झाला हे अनिष्ट टळावे म्हणून तो शिवउपासना करीत होता. राजाच्या मुलीला ही तीचे भावी वर्तमान कळाले त्यामुळे ती चिंतातूर होऊन याज्ञवलक्य पत्नी मैत्रेयी हिच्याकडे गेली व भावी अनिष्ट निवार्नाचा मार्ग काय म्हणून विचारले. तेव्हा तीने सोमवार शिवप्रत करण्यास सांगितले त्याप्रमाणे तीने श्रद्धेने सोमवार व्रताचा आरंभ केला पुढे राजाने सीमंतिनी व चित्तांगद राजा यांचा विवाह मोठ्या थाटात करून दिला. पुढे काहि निमित्ताने राजाने सीमंतिनी व चित्रांगद या दोघाउभयतास बरेच दिवस आपल्या जवळ ठेवून घेतले. चित्रांगद एके दिवशी गंगेत नावेत बसून विहार करीत असता नौका बुडाली हे वर्तमान राजाला कळताच सर्वांना अत्यंत दुःख झाले. त्याच वेळी नैषधाचे राज्य शत्रू हिरावून घेऊन इंद्रसेनास बंदी केले. परंतु सीमंतिने एवढे दुःख सहन करून सोमवारव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगदाला नागकन्यांनी पाताळात नेले. राजा तक्षक यांचे समोर उभे केले. तक्षकाने राजाची सर्व चौकशी करून सर्व हकीकत जानुन घेतली काही दिवस त्याला ठेवून घेतले व त्याची माता पित्यास भेटण्याची उत्कंठा पाहून त्याला बारा सहस्त्रनागाचे बळ देवून तू माझे स्मरण करताच मी येईन असे वचन देवून अनेक अमुल्य वस्तु भेट म्हणून बरोबर दिल्या व गंगेतीरावर आनुन सोडले. अचानक त्याचवेळी राजाची व सिमंतीनीची भेट झाली परंतु राजाने ओळख न देता तुझा पती जिवंत असून तिन दिवसांनी भेटेल म्हणुन सांगितले. पुढे नैषध नगरीत जावून शत्रुला शरण आणून मातापित्यांना मुक्त केले. तिसऱ्या दिवशी सिमंतिनीस भेट दिली त्या योगे आनंदउत्सव साजरा केला चित्रांगदाने पुढे अनेक वर्षे राज्य केले व सिमंतिनीच्या सोमवारव्रत सामर्थ्याने निरंतर सुखाची प्राप्ती झाली.

Shree Shivleelamrut Adhyay Sahava (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय सहावा (सार)

श्रीगणेशाय नमः ।। जय जय मदनांतक मनमोहना ।। मदमत्सरकाननदहना ।। हे भवभयपाशनिकृतना ।। भवानीरंजना भयहारका ।। १ ।। हिमाद्रिजामाता गंगाधरा ।। सिंधुरवदनजनका कर्पूरगौरा ।। पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा ।। त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ २ ।। नीलग्रीवा सुहास्यवदना ।। नंदीवहना अंधकमर्दना ।। गजांतका दक्षऋतुदलना ।। दानवदमना दयानिधे ॥ ३ ॥ अमितभक्तप्रियकरा ।। ताटिकांतकपूज्य त्रितापहरा ।। तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा ।। शक्ति नव्हेचि सर्वथा ।॥४॥ नित्य शांत निर्विकल्प निरंजना ।। आशापाशरहित विरक्त पूर्णा ।। निजभक्तपाशविमोचना ।। जन्ममरणां मोचक जो ।।५ ।। जे विषयकामनायुक्त ।। तुज स्वामी अनन्य भजत ।। त्यांसी पुरविसी विषयपदार्थ ।। जे जे इच्छित सर्वही ॥ ६ ॥ सकामासी कामना पुरवून । तूं निजध्यानीं लाविसी मन ॥ तेंच परम विरक्त होऊन ।। पद निर्वाण पावती ॥७॥

श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्‌गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. मदनाचा नाश करणाऱ्या, मद, मोह आणि मत्सराचे अरण्य जाळून टाकणाऱ्या, भवभयाचा नाश करणाऱ्या, श्री भवानी देवीचे मनोरंजन करणाऱ्या हे शिवशंकरा, तुझा जयजयकार असो.।।१।। देवा, तू हिमालयाचा जावई आहेस, तू मस्तकावर गंगा धारण केली आहेस, तू सिंदुरवदन अशा गजाननाचा पिता आहेस. तुझी अंगकांती कापरासारखी शुभ्र आहे. तू विष्णूंचे मनोरंजन करणारा, त्रिपुरासुराचा वध करणारा, त्रिगुण दोषांचे शमन करणारा, अवघ्या त्रैलोक्याचा स्वामी असा तूच आहेस. ||२|| तुझ्या वदनावर सुहास्य आहे, तुझा कंठ निळा आहे, तुझे नंदी हे वाहन असून, तू अंधकासुराचा नाश करणारा आहेस. गजासुराचा वध आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा, राक्षसांचे दमन करणारा तूच आहेस. ।।३।। तू जसा तुझ्या भक्तांना प्रिय आहेस, तसाच ताटिकेचा वध करणाऱ्या श्री रामचंद्रांचाही तू प्रिय आहेस. तू त्रिविध ताप दूर करणारा आहेस. तुझे गुणगान करण्यासाठी दशशतवक्त्र आणि शेषनाग हेही उणे आहेत ।।४।। हे नित्य शांत, निर्विकार, निरंजन, सर्व आशापाशरहित असलेल्या वैराग्याचा मुकुटमणी असलेल्या महादेवा, तू भक्तांना मोक्ष देणारा आणि त्याचे जन्ममरणाचे फेरे चुकविणारा आहेस. ।।५।। जे कोणी भक्त मनात एखादी कामना धरून तुझी आर्त भावाने भक्ती करतात, त्याची मनोकामना तू पूर्ण करतोस. ।।६।। आपल्या भक्तांच्या इच्छा, कामना पुरवून तू त्यांना तुझ्या ध्यानात रममाण करून घेतोस. त्यामुळे त्यांच्या मनोवृत्ती विरक्त होतात आणि अशा तुझ्या भक्तांना अंती तुझ्या पदाशी ठाव मिळतो. ।।७।।

सोमवार शिवरात्रि प्रदोष ।। आचरतां तरले असंख्य स्त्रीपुरुष ।। येचिविषयीं कथा निर्दोष ।। सूत सांगे शौनकादिकां ॥८ ॥ आर्यावर्त देश पवित्र ।। तेींचा चित्रवर्मा नाम नृपवर ।। जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र ।। तैसा पुण्यशील प्रतापी ॥९॥ जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ ॥ तैसा गोविप्रपाळक नृपाळ ।। दुष्ट दुर्जन शत्रु खळ ॥ त्यांसी काळ दंडावया ॥१०॥ प्रयत्नाविषयीं जैसा भगीरथ ।। बळासी उपमिजे वायुसुत ॥ समरभूमीस भार्गव अजित ।। विरोचनात्मज दानाविषयीं ॥११॥ शिव आणि श्रीधर ।। यांच्या भक्तीस तत्पर ।॥ त्यास झालें बहुत पुत्र ॥ पितयातुल्य प्रतापी ॥१२॥ बहुत नवस करितां पंचवदना ।। एक कन्या झाली शुभानना ।। सुलोचना नैषधअंगना ।। उपमेस तिच्या न पुरती ॥१३॥ तारकारिजनकशत्रुप्रिया ।। वृत्रारिशत्रुजनकजाया ।। उपमा देतां द्विजराजभार्या ।। बहुत वाटती हळुवट ॥१४॥ ते अपर प्रतिमा भार्गवीची ।। उपमा साजे हैमवतीची ।। कीं द्रुहिणजाया पुत्री मित्राची ।। उपमा साच द्यावी तीतें ॥ १५ ॥ कलंकरहित रोहिणीधव ।। तैसा मुखशशी अभिनव ।। त्रैलोक्यसौंदर्य गाळूनि सर्व ।। ओतिली वाटे कमलोद्भवें ।। १६ ।।

तुझी सोमवार, शिवरात्र किव्वा प्रदोष पुजाकरून आजवर असंख्य स्त्री पुरुष तरले आहेत. सुत यासंदर्भात एक सुंदर अशी कथा शौनकादिक श्रोत्यांना निवेदन करतात. ।।८।। या आर्यावर्तात पूर्वीच्या नल आणि हरिश्चंद्र राजांसारखाच पराक्रमी पुण्यवान असा चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. ||९|| तो आपल्या नगरीच्या प्रजेचे, गोब्राह्मणांचे पित्यासारखे संरक्षण व संगोपन करीत असे. तसेच तो दुष्ठ, दुर्जन आणि शत्रू ह्यांचा जणू काळच होता. ।।१०।। प्रयत्नांच्या बाबतीत भगीरथासही मागे सारणारा, शक्तिसामर्थ्याच्या बाबतीत प्रति हनुमंत असणारा, रणांगणात तो परशुरामासारखा तर दानाच्या विषयात त्या बळिराजासारखा नामांकित होता. ।।११।। हा चित्रवर्मा राजा हरीहरांचा भक्त होता. त्यास ईश्वरकृपेने त्याच्यासारखेच पराक्रमी असे अनेक पुत्र होते. ।।१२।। शिवशंकरांच्या कृपेने पुढे या राजास एक अत्यंत सद्गुणी आणि रूपवती कन्या झाली. ती इतकी शुभलक्षणी होती की, तिच्यापुढे इंद्रजिताची पत्नी सुलोचना काय किंवा नैषधराजाची पत्नी दमयंती काय ह्या उण्या पडाव्यात. ।।१३।। तिच्या गुणसौंदर्यापुढे तारकारी-जनक-शत्रुप्रिया आणि वृत्रारी-शत्रु-जनकजाया यादेखील फिक्या पडत होत्या. ||१४|| अशी ती राजकन्या ही जणू लक्ष्मीची दुसरी प्रतिमा होती. ती पार्वती किंवा सूर्यकन्या द्रुहिणजाया म्हणजेच सावित्रीसारखी होती. ।।१५।। तिचे मुखकमल हे कलंकहीन चंद्रासारखे होते. जणू ब्रह्मदेवाने तिला निर्माण करताना अवघ्या त्रैलोक्यातील सुंदरता तिच्या मुशीत ओतली होती. ।।१६।।

तिच्या जन्मकाळीं द्विज सर्व ।। जातक वर्णिती अभिनव।। चिन्नवर्मा रायासी अपूर्व ।। सुख वाटलें बहुतचि ॥ १७ ॥ एक द्विज बोले सत्य वाणी ।। ही होईल पृथ्वीची स्वामिणी ।। दहा सहस्र वर्षे कामिनी ।। राज्य करील अवनीचें ॥१८॥ ऐकतां तोषला राव बहुत ।। द्विजांस धन वस्त्रे अलंकार देत ।। जेणें जें मागितलें तें पुरवीत ।। नाहीं नेदीं न म्हणेचि ॥१९॥ तिचें नाम सीमंतिनी ।। सीमा स्वरूपाची झाली तेथूनी ।। लावण्यगंगा चातुर्यखाणी ॥ शारदेऐसी जाणिजे ॥ २० ॥ राव संतोषें कोंदला बहुत ।। तों अमृतांत विषबिंदु पडत ।। तैसा एक पंडित ।। भविष्यार्थ बोलिला ।॥२१ ॥ चवदावें वर्षों सीमंतिनीसी ।। वैधव्य येईल निश्चयेंसी ।। ऐसें ऐकतां राव मानसी ।। उद्विग्न बहुत जाहला ॥ २२ ॥ वाटे वज्र पडिलें अंगावरी ।। कीं सौदामिनी कोसळली शिरीं ।॥ किंवा काळिजीं घातली सुरी ।। तैसें झालें रायासी ॥२३॥ पुढती बोले तो ब्राह्मण ।। राया शिवदयेंकरून ॥ होईल सौभाग्यवर्धन ।। सत्य सत्य त्रिवाचा ॥२४॥ विप्र सदना गेले सवेग ।। रायासी लागला चिंतारोग ।। तंव ती शुभांगी उद्वेग – ।। रहित उपवर जाहली ।। २५ ।।

या सुकन्येच्या जन्माबरोबरच अनेक भविष्यकारांनी तिचे असे भाकित वर्णिले होते की, ज्यामुळे त्या चित्रवर्मा राजास अपूर्व असा आनंद होत होता. ।।१७।। एक ब्राह्मण म्हणाला की, हे राजन, ही सुलक्षणी कन्या पुढे दहा हजार वर्षे पृथ्वीवर राज्य करील. ।।१८।। तेव्हा संतुष्ट झालेल्या राजाने त्या ब्राह्मणाला विपुल धन आविस्त्रालंकार देऊन त्याचा सन्मान केला. ज्यांनी ज्यांनी जे जे मागितले ते सर्व काही राजाने त्यांना दिले व संतुष्ट केले. त्याने कोणासही कशा नाही म्हटले नाही. ||१९|| राजाने सौंदर्याची परिसीमा झालेल्या आपल्या या कन्येचे नाव सिमंतिनी असे ठेवले. ती सौंदर्याची जणू गंगा आणि चातुर्याची शारदाच होती. ||२०|| इकडे राजा हा लेकीच्या भविष्याने अतिसंतुष्ट होत असतानाच अमृतात विषाचा थेंब टाकावा तसले भाकित एका ब्राह्मणाने केले. ।।२१।। त्या ब्राह्मणाने असे भाकित वर्तविले की, ही सुंदरशी कन्या तिच्या चौदाव्या वर्षीच विधवा होईल. ते भाकित ऐकताच राजा चित्रवर्मा हा मनोमन फारच दुःखीकष्टी झाला. ||२२|| त्यास त्याच्या अंगावर जणू वीजच कोसळत असल्यासारखे कोणीतरी काळजात सुरी खुपसते आहे असे वाटले. ।।२३।। तेव्हा राजास धीर देत तो ब्राह्मण राजास म्हणाला की, “हे राजन, तू असा फार चिंतित होऊ नकोस. हे बघ ! भगवान शंकरांच्या कृपेने तुझ्या सुकन्येचे सौभाग्य नक्कीच वर्धित होईल. एवढे लक्षात ठेव.”।।२४।॥ त्यानंतर सर्व ब्राह्मणा है निघून गेले. राजा चित्रवर्यास मात्र एका नव्या चिंतारोगाने ग्रासले. हळूहळू काळ पुढे सरकला आणि ती सुलक्षणी सीमंतिनी राजकन्या ही विवाहानुरूप झाली.

सकळकळाप्रवीण ।। चातुर्यखाणीचें दिव्यरत्न ।। तिचें ऐकतां सुस्वर गायन।। धरिती मौन कोकिळा ।। २६ ।। अंगींचा सुवास पाहून ।। कस्तुरीमृग घेती रान ।। पितयास आवडे प्राणांहून ।। पाहतां नयन न धाती ॥२७॥ वदन पाहूनि रतिपति लज्जित ।। कटी देखोनि हरि वदन न दाखवीत ।। गमन देखोनि लपत ।। मराळ मानससरोवरीं ॥ २८ ॥ क्षण एक चाले गजगती ।। देखोनि शंकला करिपती ।। कुरळ केश देखोनि भ्रमरपंक्ती ।। रुंजी घालिती सुवासा ॥२९॥ कमळ मृग मीन खंजन ।। लज्जित ॐ देखोनि जिचे नयन ॥ वेणीची आकृती पाहून ॥ भुजंग विवरीं दडाले ॥३०॥ या वृक्षावरूनि त्या वृक्षीं देख ॥ शुक पळती पाहतां नासिक । बिंबफळें अति सुरेख ॥ लज्जित अधर देखतां ।॥३१ ॥ पक्वडाळिंबबीज सुरंग बहुत ।। त्यांस लाजविती जिचे दंत ।। कुच देखोनि कमंडलु शंकित ।। स्वरूप अद्भुत वर्णं किती ॥ ३२॥ तनूचा सुवास अत्यंत ।। जाय दशयोजनपर्यंत ।। सूर्यप्रभासम कांति भासत ।। शशिसम मनोरमा ।। ३३ ।। झाली असतां पवर ।। तिच्या पद्मिणी सख्या सुंदर ।। किन्नरकन्या मनोहर ।। गायन करिती तिजपासीं ।॥ ३४ ॥

सीमंतिनी ही मोठी कलानिपण, चतुर आणि सुस्वर कंठाची होती. तिचे गायन ऐकून प्रत्यक्ष कोकिळाही मौन धरीत. ।।२६।। तिच्या अंगीचा सुवास दरवळताच कस्तुरीमृग रानात धाव घेत. ती पित्यास इतकी प्रिय होती की, तिला पाहून त्यास मोठे आंतरिक समाधान मिळत असे. ।। २७|| तिचे सुंदर मुख पाहून मदनही लज्जेने मान खाली घालत असे. तिची सिंहकटी पाहून सिंहही तोंड लपवीत असे. तिचे मोहक चालणे पाहून मानस सरोवरीचे ॐ हंससुद्धा सरोवरात खाली माना घालून लपून बसत. ||२८|| तिची हत्तीसारखी धिमी चाल पाहून हत्तीही शंकित होत. तिच्या काळ्याभोर कुंतलांचा सुवास घेण्यासाठी भुंगे लाचावत. ।। २९ ।। तिचे नेत्रकमळ पाहून हरीण, मासे व खंजन पक्षी लाजेने चूर होत. तिच्या वेणीची नागमोडी वळणे पाहून नागवेखील वारुळात लपून बसत. ||३०|| तिचे नाक पाहून पोपट इकडून तिकडे धावत. तिचे खालचे ओठ पाहून बिंबफळेही लाजून जात. ।।३१।। पिकलेल्या रसाळ डाळिंबाच्या बियांनाही लाजवतील असे तिचे दात होते. तिचे वक्षः स्थळ पाहून कमंडलूसुद्धा शंकित होत. अशा त्या लावण्यसुंदरीचे गुणवर्णन ते काय आणि किती करावे? ।।३२।। तिच्या अंगीचा सुवास हा दहा-वहा योजने पसरत असे. तिची अंगकांती सूर्याप्रमाणे तळपती होती, तर ती चंद्रासारखी शांत शीतल स्वभावाची होती. ||३३|| अशी ही सीमंतिनी राजकन्या उपवर होताच तिच्या सख्या विविध प्रकारचे गायन करून तिचे मनोरंजन करीत. ।।३४।।

त्यांच्या मुखेंकरोनी ॥ वार्ता ऐके सीमंतिनी ।। चतुर्दशवर्षी आपणालागुनी ।। वैधव्य कथिलें ऋषीनें ॥ ३५ ॥ परम संताप पावली ते समयीं ।॥ याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी ॥ तिचे पाय धरूनि लवलाहीं ।। पुसे सद्गद होवोनियां ॥ ३६ ॥ सौभाग्य-वर्धनव्रत ।। माये कोणतें सांग त्वरित ।। कोणतें पूजूं दैवत ।। कोणत्या गुरूसी शरण जाऊं।॥ ३७ ॥ सांगितला सकळ वृत्तांत ।। चवदावें वर्षों वैधव्य यथार्थ ॥ मग मैत्रेयी बोलत ।। धरीं व्रत सोमवार ॥ ३८ ॥ सांगे शिवमंत्र पंचाक्षरी ।। तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी ।। निशी झालिया पूजावा त्रिपुरारी ।। षोडशोपचारें सप्रेम ॥ ३९ ॥ म्हणे तुज दुःख झालें जरी प्राप्त ।। तरी न सोडीं हैं व्रत ।। ब्राम्हणभोजन दांपत्य बहुत ।। पूजीं माये अत्यादरें ।॥४० ।। पडिले दुःखाचें पर्वत ॥ तरी टाकूं नको हें व्रत ।। उबग न धरीं मनांत ।। बोल न ठेवीं व्रतातें ॥४१ ।। त्यावरी नैषधराज नळ जाण ।। त्याचा पुत्र इंद्रसेन ।। त्याचा तनय चित्रांगद सुजाण ॥ केवळ मदन दूसरा ॥४२॥ चतुःषष्टिकळायुक्त ।। जैसा पितामह नळ विख्यात ।। सर्वलक्षणीं दिसे मंडित ॥ चित्रांगद तैसाचि ॥४३॥

त्या सख्यांशी वार्तालाप करत असताना तिला आपल्याला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याची वार्ता समजली.||३५|| तेव्हा एकदा राजमंदिरी आलेल्या याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला तिने असे विचारले की, ।। ३६ ।। हे देवी, तू कृपाकरून जेणेकरून माझे सौभाग्यवर्धन होईल, असे कोणते व्रत करू, मी कोणत्या देवाची पूजा करू? मी कोणास शरण जाऊ, ते मला सांग ||३७|| तसेच सीमंतिनीने आपली समस्याही तिला निवेदन केली. तेव्हा मैत्रेयीने तिला तू सोमवारच्या प्रदोष व्रताचे आचरण कर, असे सांगितले. ||३८|| तसेच त्या मैत्रेयी ऋषिभार्येने तिला सौभाग्यवर्धनासाठी सिद्ध पंचाक्षरी शिवमंत्र, प्रदोष पूजनाचा विधी, त्याची सर्व पद्धती ह्याची सविस्तर माहिती दिली. ||३९|| त्याबरोबरच मैत्रेयीने तिला असाही सल्ला दिला की, तुला कितीही दुःख झाले, कोणतेही संकट आले तरी तू हे व्रत सोडू नकोस. त्यात खंड पाडू नकोस. या व्रतानिमित्ताने तू ब्राह्मण दांपत्याची शिवपार्वती मानून पूजा करीत जा. त्यांना भोजन देत जा.।।॥४०॥ जीवनात तुझ्यावर जरी दुःखांचा कितीही मोठा पहाड कोसळला तरी हे व्रत सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस किंवा त्यास बोलही लावू नकोस. ।।४१।। पुढे नैषधराजा नल याचा नातू चित्रांगद, जो जणू मदनाचा दुसरा पुतळाच होता, त्याची सीमंतिनीसाठी निवड करण्यात आली. ।।४२।। चित्रांगद हा चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्यात निपुण तर होताच, तसेच तो आपल्या आजोबांसारखा सर्वगुणसंपन्न आणि विख्यातही होता. ।।४३।।

कुंभिनी शोधिली समग्र ।। परी त्याहूनि नाहीं सुंदर ।। तो तीस योजिला वर ।। राशि नक्षत्र पाहूनी ।।४४।। इकडे सीमंतिनी आचरे व्रत ।। सांगितल्याहूनि विशेष करीत ।। आठ दिवसां अकरा शत।। दंपत्यें पूजीत वस्त्रालंकारें ॥४५॥ आणिकही ब्राह्मणभोजन ।। आल्या अतीथा देत अन्न ।। सांग करी शिवपूजन ।। जागरण सोमवारनिशीं ।॥४६॥ पंचसूत्रीं शिवलिंग ।। मणिमय शिवसदन सुरंग ।। कोण एक न्यून प्रसंग ।। न घडे सीमंतिनीपासूनी ॥ ४७ ॥ । शिवास अभिषेकितां पापसंहार ।। शिवपूजनें साम्राज्य अपार ।। गंधाक्षता माला परिकर ।। सौभाग्यवर्धन त्याकरितां ।॥ ४८ ॥ शिवापुढें धूप जाळितां बहुवस ।। तेणें आंग होय सुवास ।। दीप चालवितां वंश ।। वर्धमान होय पैं ।॥४९॥ आणिकही दीपाचा गुण ।। कांति विशेष आयुष्यवर्धन ।। नैवेद्ये भाग्य पूर्ण ।। वर्धमान लक्ष्मी होय ॥ ५० ॥ तांबूलदानें यथार्थ ।। सिद्ध चारी पुरुषार्थ ।। नमस्कारें आरोग्य होत ॥ प्रदक्षिणें भ्रम नासे ॥ ५१ ॥ जपें साधे महासिद्धी ।। होमहवनें होय कोशवृद्धी ।। कीर्तन करितां कृपानिधी ॥ सांब ठाके पुढें उभा ॥५२॥

अशा सकल पृथ्वी शोधली तरी त्याच्यासारखा अन्य कोणी सापडणार नाही अशा चित्रांगदाची सीमंतिनीसाठी सुयोग्य वर म्हणून योजना करण्यात आली. त्यास रास, नक्षत्रे, गुणमिलन ह्यांची ही साथ मिळाली. ।।४४।। इकडे सीमंतिनी ही मैत्रेयीने सांगितले त्यापेक्षाही अधिक उत्तम प्रकारे ते शिवपूजाचे व्रत आचरत होती. ती व्रताच्या दिवशी अकराशे विप्र दांपत्यांना वस्त्रालंकार व भोजन प्रदान करीत असे. ।।४९|| त्याबरोबरच ती अतिथींना अन्नदान, सश्रद्धेय शिवपूजन, रात्री जागरण आणि नित्य शिव पंचाक्षरी मंत्राचा जपही करीत असे. ।।४६|| या शिवोपासनेसाठी तिने एका शिव मंडपाची उभारणी करवून घेत त्यात पंचसूत्री शिवलिंगाची स्थापना केली होती. ती आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देत नसे. ।।४७।। कारण शिवास अभिषेक घातला तर नाना पापांचा संहार होतो. शिवपूजनाने साम्राज्याची प्राप्ती होते, तर शिवास गंध, फूल, अक्षता इ. अर्पण केल्यास स्त्रियांना सौभाग्य वर्धनाचा लाभ होतो. । ४८ ।। शिवापुढे धूप प्रज्वलन केल्यास सर्वांग सुगंधित होते. देवापुढे दीप लावल्यास वंशाचा विस्तार होतो. ।।४९|| तसेच या दीप प्रज्वलनांचा आणखी एक फायदा म्हणजे उपासकाची अंगकांती उजळते, त्यास आयुष्यवृद्धी प्राप्त होते. शिवास नैवेद्य अर्पण केल्यास सौभाग्य आणि धनलक्ष्मीचा लाभ होतो. ॥५०॥ शिवास तांबूल दिल्यास चारी पुरुषार्थांची सिद्धी मिळते. नमस्काराने उत्तम आरोग्य लाभते. त्यास प्रदक्षिणा घातली असता बुद्धिभ्रंश झाला असल्यास तो दूर होतो. ।।५१|| शिवांच्या नामजपाचे फलित म्हणजे महासिद्धीचा लाभ होणे, होमहवन केल्यास धनकोशाची वृद्धी होणे, शिवासमोर त्याचे कीर्तन केल्यास शिवपार्वतीचे दर्शन होणे, असे लाभ

ध्यानें होय महाज्ञान ।। श्रवणें आधिव्याधिहरण ।। नृत्यकरितां जन्ममरण ।। धूर्जटी दूर करीतसे ॥५३॥ तंतवितंत घन सुस्वर ।। शिवप्रीत्यर्थ करितां वाद्य समग्र ।। तेणें कंठ सुरस कीर्ति अपार ।। रत्नदानें नेत्र दिव्य होती ।॥५४॥ एवं सर्व अलंकार वाहतां ।। सर्वां ठाई जयलाभ तत्त्वतां ।। ब्राह्मणभोजन करितां ।। वणिलें सर्व प्राप्त होय ॥५५ ।। मैत्रेयीनें पूर्वी ‘व्रत ।। सीमंतिनीसी सांगितलें समस्त ।। त्याहूनि ते विशेष आचरत ।। शिव पूजित आदरें ।॥ ५६ ॥ त्यावरी नैषधाचा पौत्र ॥ चित्रांगद नामें गुणगंभीर ॥ त्यासी आणोनियां सादर ।। सीमंतिनी दीधली ॥५७॥ चारी दिवसपर्यंत ।। सोहळा झाला जो अद्भुत ।। तो वर्णितां ग्रंथ यथार्थ ।। पसरेल समुद्राऐसा ॥ ५८ ॥ सहस्र अर्बुदें धन जाणा ।। रायें दिधली वरदक्षिणा ।॥ वस्त्रं अलंकार नवरत्नां ।। गणना कोणा न करवे ॥ ५९ ॥ अश्वशाळा गजशाळा ॥ रत्नखचित यानें विशाळा ।। चित्रशाळा नृत्यशाळा ।। आंदण दिधलें जामाता ॥ ६० ॥ चारी दिवसपर्यंत ।। चारी वर्ण केलें तृप्त ।। विप्रां दक्षिणा दिधली अपरिमित ।। नेतां द्विज कंटाळती ॥ ६१ ॥ आश्रमा धन नेतां ब्राह्मण ।। वाटेस टाकिती न नेववे म्हणून ।। याचकां मुखीं हेंचि वचन ।। पुरे पुरे किती न्यावें ॥६२॥

शिवाचे ध्यान केले असता महाज्ञानाची प्राप्ती घडते. शिवनाम श्रवणाने आधिव्याधी दूर होतात, शिवापुढे नृत्यसेवा सादर केल्यास शिवाच्या कृपेने जन्ममरणाच्या शृंखलेतून मुक्तता होते. ।।५३।। शिवापुढे तंतू व तंतुरहित वाद्ये वाजविली असता उपासकाचा कंठ सुस्वर होतो. शिवासाठी रक्तदान केल्यास नेत्रांना दिव्य शक्ती प्राप्त होते. ।।५४।। थोडक्यात काय तर शिवाची सर्वतोपरीने पूजा केली असता सर्व कार्यात यश लाभते, ब्राह्मणास भोजन दिले असता सर्व वांच्छित फलांची प्राप्ती होते. ।। ५५|| मैत्रेयीने सीमंतिनीला पूर्वी जे व्रत सांगितले ते व्रत ती एकनिष्ठेने आणि अधिक उत्तम प्रकारे आचरत होती. ।।५६।। जो सुयोग्य असा चित्रांगद तिला पती म्हणून निवडला होता त्यास आणून तिचा त्याचेशीच विवाह करून देण्यात आला. ।।५७।। कवी श्रीधर इथे असे म्हणतात की, ज्याप्रकारे तो विवाह सोहळा थाटामाटाने चार दिवस संपन्न झाला त्याचे विस्तृत वर्णन करायचे झाले तर फार मोठा ग्रंथ विस्तार होईल. ।।५८|| राजाने आपल्या जामातास सहस्र अर्बुदे इतके दान दिले. त्यास नाना वस्त्रालंकार, रत्ने दिली. ।।५९।। तसेच राजाने जावयास अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा या गोष्टी आंदण म्हणून दिल्या. ।। ६० ।। चार दिवस चाललेल्या या विवाह समारंभाच्या वेळी चारी वर्णांच्या लोकांना तृप्त केले. ब्राह्मणांना आता पुरे म्हणावे इतके दान दक्षिणा दिल्या. ।। ६१।। राजाने विप्रांना इतके भरभरून दिले की, ते नेताना सांडू लागले. जो तो तृप्तीने पुरे पुरे असे म्हणू लागला. ।।६२।।

औदार्यकृशान ।। दारिद्र्यरान टाकिलें जाळून ।। दुराशा दुष्कंटकवन ।। दग्ध झालें मुळींहूनी ।।६३ ।। धनमेघ वर्षतां अपार ।। दारिद्र्यधुरोळा बैसला समग्र ।। याचकतृप्तितृणांकुर ।। टवटवीत विरूढले ।॥६४।। असो नैषधपुरींचे जन ।। पाहती सीमंतिनीचें वदन ।। इंदुकळा षोडश चिरून ।। द्विज ओतिले बत्तीस ।। ६५ ।। कलंक काढूनि निःशेष ।। द्विजसंधी भरल्या राजस ।। मुखींचे निघतां श्वासोच्छ्वास ।। सुगंधराज तोचि वाटे ॥६६ ।। जलजमुखी जलजकंठ ।। जलजमाला तेज वरिष्ठ ।। जलजनिंबपर्ने करूनि एकवट ।। ओंवाळूनी टाकिती शशिमुखा ।। ६७ ।। असो साडें झालिया पूर्ण ।। नैषधदेशा गेला इंद्रसेन ।। सकळ वऱ्हाडी अनुदिन ।। सौंदर्य वर्णितीं सीमंतिनीचें ॥ ६८ ॥ विजयादशमी दीपावळी लक्षून ।। जामात राहविला मानेंकरून ।। कितीयेक दिवस घेतला ठेवून ।। चित्रवर्मा राजेंद्रं ॥ ६९ ॥ जैसा श्रीरंग आणि इंदिरा ॥ तैसा जोडा दिसे साजिरा ।। नाना उपचार वधुवरां ।। समयोचित करी बहु ।।७० ।। कोणे एके दिवशीं चित्रांगद ।। सर्वे घेऊनि सेवकवृंद ।। धुरंधर सेना अगाध ।। जात मृगयेलागूनी ।।७१ ।। वनीं खेळतां श्रमला फार ।। घर्म आला तप्त शरीर ।। जाणोनि नौका सुंदर ।। यमुनाडोहीं घातलीं ।।७२।।

राजाच्या या दातृत्वाच्या अग्नीने प्रजाजनांचे दारिद्र्य रूपी रान जणूकाही जाळून नष्ट करून टाकले, दुःख, दैन्य, निराशा ह्याचे पार मुळापासूनच उच्चाटन केले. ।।६३।। राजाने प्रजेवर केलेल्या धनवर्षावाने वारिद्रयाचा धुरळा पार खाली बसला. लोकमानसाच्या भूमीतून तृमीचे नवे तृणांकुर हे फोफावून वर आले. ।।६४।। तिकडे नैषध नगरीच्या प्रजाजनांस सीमंतिनीसारखी सौंदर्यवती राणी पाहून अतिशय आनंद झाला. ।।६५|| तिचा मुखचंद्रमा कलंकरहित चंद्रासारखा शोभून दिसत होता, तर तिच्या मुखातून, तिच्या श्वासोच्छश्वासातून सुगंध बाहेर पडत होता. ।। ६६ ।। कमळासारखे वदन असलेल्या, शंखासारखा कंठ असलेल्या, मोत्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या, अशा तिच्या मुखमंडलावरून मीठ आणि निंबपत्रे ओवाळून टाकली जात होती. ।।६७।। असो, अशा या आपल्या नगरीच्या नव्या महाराणीचे नगरजन मुक्त कंठाने कौतुक करीत होते. तिच्या गुणसौंदर्याची वाखाणणी करीत होते. ।।६८ ।। पुढे एकदा चित्रवर्याने दसरा-दिवाळीच्या निमित्ताने आपली लेक आणि जावयास आपल्या नगरीत बोलावून घेतले आणि मोठ्या कौतुकाने त्यांना बरेच दिवस तिथे ठेवून घेतले. ।।६९।। राजा चित्रांगद आणि सीमंतिनी ह्या दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी शोभून दिसत होती. सासऱ्याने त्यांचा उचित मानसन्मान केला. ।।७०।। एके दिवशी चित्रांगद आपली धुरंधर सेना आणि काही सेवक ह्यांना घेऊन वनात शिकारीसाठी गेला. ||७१|| वनात शिकार करीत असता अतिशय दमल्याने, घामाघूम झाल्याने त्याने नौकाविहार करण्याच्या इराद्याने आपली नौका ही यमुनेत घातली.।।७२।।

त्यांत मुख्य सेवक घेऊन ।। बैसला चित्रांगद गुणनिधान ।। आवले आवलोकिती चहूंकडून ।। कौतुकें भाषण करिताती ।। ७३ ।। कृतांत भगिनीचें उदक ।। कृष्णवर्ण भयानक ।। त्या उदकाचा अंत सम्यक ।। कधीं कोणीं न घेतला ।।७४ ।। तों प्रभंजन सुटला अद्भुत ।। नौका तेथें डळमळीत ।। आवले आक्रोशें बोलत ।। नौका बुडाली म्हणोनियां ॥७५॥ भयभीत झाले समस्त ।। नौका बुडाली अकस्मात ।। एकचि वर्तला आकांत ।। नाहीं अंत महाशब्दां ॥ ७६ ॥ तीरीं सेना होती अपार ।। तिच्या दुःखासी नाहीं पार ।। चित्रांगदाचे पाठिराखे वीर ।। आकांत करिती एकसरें ।॥ ७७ ॥ सेवक धांवती हांक फोडीत ।। चित्रवर्त्यासी जाणविती मात ।। राव वक्षःस्थळ बडवीत ।। चरणीं धांवत यमुनातीरीं ।।७८ ।। शिबिकेमाजी बैसोनी ।। मातेसमवेत सीमंतिनी ।। धांवत आली तेच क्षणीं ।॥ पडती धरणीं सर्वही ॥७९।। दुःखार्णवीं पडलीं एकसरी ॥ तेथें कोणासी कोण सांवरी ।। सीमंतिनी पडली अवनीवरी ।। पिता सांवरी तियेसी ॥८० ॥ माता धांवोनि उठाउठीं ।। कन्येच्या गळां घाली मिठी ।। शोक करी तेणें सृष्टीं ।। आकांत एकचि वर्तला ॥८१॥

त्यात काही प्रमुख सेवकांना सोबत घेऊन तो नौकेत बसला, तर इतर ते नौकानयन बाजूस उभे राहून पाहात होते. परस्परात काही बोलत होते. ।।७३।। यमुनेचे पाणी काळेभोर होते. त्याचा खोलीचाही नेमका तसा कोणास अंदाज नव्हता. ।।७४|| तेवढ्यात अचानक काय झाले कोणास कळले नाही. एकाएकी प्रचंड मोठा वारा सुटला. चित्रांगदाची नाव हेलकावे खाऊ लागली. त्याबरोबर सारेजण घाबरून गेले आणि नौका बुडाली बुडाली असे ओरडू लागले. ॥७५॥ आणि तशातच एकाएकी एका मोठ्या लाटेबरोबर ती नौका उलटी झाली आणि बुडाली. त्याबरोबर एकच आकांत झाला. लोकांच्या किंकाळ्या, आरोळ्या ह्यांना सीमाच राहिली नाही. ।। ७६।। नदीच्या तीरावरील सेनेच्या दुःखाला पारावार राहिला नाही. चित्रांगद बुडाला, जामात बुडाला, असे म्हणून सारेजण एकच आकांत करू लागले. ।। ७७|| सेवकवर्ग ती वार्ता घेऊन धावत चित्रवर्याकडे आले. ती वार्ता ऐकून छाती पिटीत राजा धावतपळत यमुनेच्या तीरावर आला. ।।७८ || राजाचे पाठोपाठ पालखीत बसून सीमंतिनी आणि तिची आई ह्या दोघीही यमुनेच्या तीरावर आल्या. सीमंतिनी तर त्या दुर्दैवी आघाताने जमिनीवरच कोसळली.||७९।। सारेजणच दुःखाच्या सागरात बुडाल्याने कोण कोणास सावरणार तेव्हा दुःखाने जमिनीवर कोसळलेल्या आपल्या कन्येस पित्याने सावरण्याचा प्रयत्न केला. ।।८०।। तोच तिची माताही तिथे धावत आली. तिने मुलीच्या गळ्यास मिठी घातली. दोघींच्या शोकाचा एकच आकांत झाला. ।।८१।।

सीमंतिनीचा शोक ऐकोनी ॥ डळमळू लागली कुंभिनी ।। मेदिनीवसनाचें पाणी ।। तप्त झालें एकसरें ॥८२॥ पशु पक्षी वनचरें समस्त ।। वृक्ष गुल्म लता पर्वत ।। त्यांसही शोक अत्यंत ।। सीमंतिनीसी पाहतां ॥८३॥ शोकें मूच्र्छना येऊनी ॥ निचेष्टित पडली सीमंतिनी ।। तों इंद्रसेनासहित गृहिणी ॥ आली वार्ता ऐकोनियां ॥८४॥ अवघीं झालीं एकत्र ।। दुःखार्णवाचा न लागे पार ।। स्नुषेतें देखोनि श्वशुर ।। शोकाग्नीनें कवळिला ॥८५ ॥ चित्रांगदाची माता पडली क्षितीं ।॥ तिचें नाम लावण्यवती ।। सकळ स्त्रिया सांवरिती ।। नाहीं मिती शोकासी ॥ ८६ ॥ मृत्तिका घेवोनि हस्तकीं ।॥ लावण्यवती घाली मुखीं ।॥ म्हणे गहन पूर्वकर्म कीं ।॥ शोक झाला यथार्थ ॥ ८७ ॥ माझा एकुलता एक बाळ ॥ परम स्नेहाळ ।। पूर्वपापाचें हें फळ ॥ कालिंदी काळ झाली आम्हां ॥ ८८ ॥ माझी अंधाची काठी पाहीं ।। कोणें बुडविली यमुनाडोहीं ।॥ मज अनाथाची गांठी पाहीं ॥ कोणें सोडिली निर्दयें ।॥८९॥ माझा दावा गे राजहंस ॥ कोणें नेलें गे माझें पाडस ॥ माझा चित्रांगद डोळस ।। कोणें चोरून नेला गे ॥९०॥ म्हणें म्यां पूर्वी काय केलें ।। प्रदोषव्रत मध्येंच टाकिलें । कीं शिवरात्रीस अन्न घेतलें ।। कीं चिन्नांगद व्रत मोडिलें सोमवार ॥९१ ।।

सौतिकीचा शौक पाहून मधुनेचे कालेज गलबलले, सागराचे पाणी तप्त झाले. ॥८९॥ सीमंतिनीकडे पाहून पशू-पक्षी, वृक्षलताबेली ह्यांनाही अनिवार अले दुःख झाले. ॥८३॥ पती विभोगाच्या शोकाने अनावर झालेली सीमंतिनी मूर्च्छा थेऊन जमिनीवर पडली, तिकडे ती वार्ता समजतात विना लावत इंद्रसेन हा पत्नीसह तिथे धावत आला. ॥८४॥ सर्वजण एकत्र घेत्ताच्च त्यांच्या दुःखास तर सीमाच राहिली नाही. सुनेस त्या तशा अवस्थेत पाहून सासऱ्यास मोठे दुःख झाले. ॥८५॥ चित्रांगदाची माता दुःखावेगाने धरणीवर कोसळत असताना तिला इतरांनी सावरले. ।।८६।। ती त्तर स्वतःच्या तोंडात भाती घालून घेत म्हणू लागली की, माझे पूर्वकर्म खडतर म्हणून हे दुःख माझ्या चाट्यास आले काय? ॥८७॥ ती म्हणाली, “माझा पुत्र चित्रांगद हा अतिप्रेमळ होता. आमच्या पूर्वकर्माचे फळ म्हणूनच की काय ही यमुना आम्हास काळनदी ठरली. “||८८।। ‘माझी अंधाची काठी कोणी यमुनेत बुडविली, माझी सोबत कोणी माझ्यापासून अशी हिरावून दूर नेली?’।॥८९॥ ‘अरे कोणीतरी माझा राजहंस मला दाखवा रे, माझं पाडस मला भेटवा रे, माझ्या देखण्या पुत्रास माझ्यापासून कोणी चोरून नेले रे.’।॥९०॥ ती म्हणू लागली, “माझ्या हातून असे कोणते पाप घडले? मी शिवाचे प्रदोष व्रत अर्धे सोडले का शिवरात्रीस अन्नग्रहण केले? का माझे हातून सोमवारचे व्रत मोडले गेले?” ।।९१।।

कीं रमाधव उमाधव ।। यांत केला भेदभाव।। कीं हरिहरकीर्तनगौरव ।। कथारंग उच्छेदिला ॥९२॥ कीं पंक्तिभेद केला निःशेष ।। कीं संतमहंतां लाविला दोष ।। कीं परधनाचा अभिलाष ।। केला पूर्वी म्यां वाटे ॥९३॥ कीं दान देतें म्हणवून ॥ ब्राह्मणासी चाळविलें बहुत दिन । कीं दाता देतां दान ।। केलें विघ्न म्यां पूर्वी ॥९४ ।। कोणाच्या मुखींचा घांस काढिला ।। कीं गुरुद्रोह पूर्वी मज घडला ।। कीं पात्रीं ब्राह्मण बैसला ॥ तों बाहेर घातला उठवुनी ॥९५॥ कीं कुरंगी पाडसां बिघडविलें । कीं परिव्राजकाप्रति निंदिलें ।॥ तरी ऐसें निधान गेलें ॥ त्याच दोषास्तव वाटे ॥९६॥ असो प्रधानवर्गी सांवरूनी ।। सहपरिवारें चित्रवर्मा सीमंतिनी ।। स्वनगरासी नेवोनी ॥ निजसदनी राहविलीं ॥९७।। इंद्रसेन लावण्यवती ।। शोकें संतप्त नगरा जाती ।। तंव दायाद येऊनि पापमती ।। राज्य सर्व घेतलें ॥९८ ॥ मग इंद्रसेन लावण्यवती ।। देशांतरा पळोनि जाती ।। तेथोनिही शत्रु धरूनि आणिती ।। बंदीं घालिती दृढ तेव्हां ॥९९॥ इकडे सीमंतिनी व्रत ॥ न सोडी अत्यादरें करीत ॥ एकादशशत दंपत्य ॥ पूजी संयुक्त विधीनें ॥१००॥

माझे हातून हरी आणि हर ह्यांच्यात भेदभाव तर केला गेला नाही ना? मी शिवकीर्तन अर्धेच टाकून उठले नाही ना?।।९१| मी कोणत्या पंक्तीत भेदभाव तर केला नाही ना? का कोणा संतास बोल लावले, का मी कधी कोणाच्या परद्रव्याची अभिलाषा मनात धरली. ।।९३।। मी कोणा ब्राह्मणास दान देते म्हणून खोटेच सांगितले, का अन्य कोणी दान देत असताना त्यास सत्कर्मापासून परावृत केले? ।।९४।। मी कोणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला का, माझ्या हातून कोणता गुरुद्रोह झाला? मी कोणा ब्राह्मणास भरल्या ताटावरून तर उठविले नाही ना? ।।९५।। मी कोणा हरिणी आणि पाडसाची ताटातूट केली, का कोणा संन्याशाची निंदा केली? माझ्या हातून असे काय पाप घडले म्हणून माझा अमूल्य ठेवा हा असा माझापासून दूर नेला गेला. ।।९६।। असो, शेवटी प्रसंगावधान राखून काही प्रधान मंडळींनी त्या सर्वांना सावरून नगरात परत नेले ||९७|| राजा इंद्रसेन आणि राणी लावण्यवतीही दुःखित मनाने आपल्या नगरीत परतली. इंद्रसेनाच्या त्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेत त्याच्याच स्वकीयांनी पापबुद्धीने त्याचे राज्य लुटले. ।।९८|| त्यावेळी त्या दोघांनी राज्याबाहेर जाण्याचा प्रयत्न केला; पण शत्रूनी त्यांना पकडले आणि अखेर बंदिवान केले. ।।९९।। इकडे सीमंतिनी मात्र तिच्यावर दुःखाचा पर्वत कोसळलेला असताना पूर्वीच्याच श्रद्धेने आपली व्रताचरणाची सेवा करीत होती. तिने ते व्रत सोडले नव्हते. ती प्रत्येक व्रताचे वेळी अकराशे दांपत्यांना शिवपार्वती म्हणून पुजून त्यांना भोजन देत होती. ।।१००।।

सर्वही भोग वर्जुनि जाण ॥ यामिनी-दिनीं नित्य करी शिवस्मरण ॥ तीन वर्षे झालीं पूर्ण ।। यावरी वर्तमान ऐका पुढे ॥१०१ ॥ इकडे चित्रांगद यमुनेंत बुडाला ।। नागकन्यांनी पाताळीं नेला ।। नागभुवनींची पाहतां लीला ।। तटस्थ झाला राजपुत्र ॥१०२॥ दिव्य नारी देखिल्या नागिणी ।। पद्मिणी हस्तिनी चित्रिणी ॥ शंखिनी अतिचतुर भामिनी ।। सुवास अंगीं ज्यांचिया ॥१०३॥ ज्यांच्या पदनखीं निरंतर ॥ गुंजारव करिती भ्रमर ॥ ज्यांचा देखतां वदनचंद्र ।। तपस्वीचकोर वेधले ॥१०४॥ नवरत्नांचे खडे ॥ पसरले तेथें चहुंकडे ।। स्वर्गसुखाहूनि आवडे ॥ पाताळभुवन पाहतां ॥१०५॥ तक्षक नागराज प्रसिद्ध ॥ त्यापुढे उभा केला चित्रांगद ॥ साष्टांग नमीत सद्गद ॥ होवोनि स्तुति करीतसे ॥१०६॥ निर्भय तेथें राजसुत ॥ तक्षक वर्तमान पुसत ।। जें जें वर्तलें समस्त ॥ केलें श्रुत चित्रांगदें ॥१०७॥ मागुती नागराज झाला बोलता ।। तुम्ही कोण्या दैवतासी भजतां ।॥ यावरी शिवमहिमा तत्त्वतां ॥ झाला वर्णिता चित्रांगद ॥१०८॥ प्रकृति पुरुष दोघे जणें ।। निर्मिलीं इच्छामात्रे जेणें ।। अनंत ब्रह्मांडें प्रीतीनें ॥ रचियेलीं हेळामात्रं ॥१०९॥ इच्छा परततां जाण ।। अनंत ब्रह्मांडें टाकी मोडून ॥ प्रकृतिपुरुषांत होती लीन ॥ पंचभूतें तत्त्वांसहित ॥ ११०॥

अशाप्रकारे सीमंतिनी अन्य सर्व भोग त्यागून ही शिवोपासना एकनिष्ठेने करीत असताना साधारण तीन वर्षांचा काळ मधे गेला. त्यानंतर काय घडले ते आता पाहूया. ।।१०१ ।। जेव्हा चित्रांगद हा यमुनेच्या डोहात बुडाला तेव्हा त्यास नाग कन्यांनी सरळ आपल्या पाताळातील नागनगरीत नेले. ||१०२।। तिथे चित्रांगदाने पद्मिनी, चित्रिणी, हस्तिनी, शंखिणी अशा विविध सुंदर सुंदर अशा नागिणी पाहिल्या. त्यांच्या अंगास एक विलक्षण असा सुवास येत होता. ।।१०३।। त्यांच्या पायांच्या नखांवर भुंगे भ्रमत होते. त्यांची मुखकमळे पाहून तपस्वीयांच्या मनाचेही चकोर तिथे गुंतून पडत. ।।१०४।। त्या नगरीत सर्वत्र रत्नांचे सडे पडलेले होते. त्यास ती नगरी स्वर्गाहून चांगली वाटली. ।।१०५|| जेव्हा त्या नागकन्यांनी चित्रांगदास त्या नगरीच्या तक्षक नागराजाच्या समोर नेले; तेव्हा चित्रांगदाने त्या तक्षकराजास नमन करीत त्याची स्तुती केली. ।।१०६ || त्या नगरीत चित्रांगद हा निर्भय होता. त्यास पाहून तक्षकाने त्याची विचारपूस केली. तेव्हा चित्रांगदाने जे जे काही घडले ते सर्व राजास निवेदन केले. ।।१०७|| तेव्हा तक्षकाने त्यास असाही प्रश्न विचारला की, तुमचे उपास्य दैवत कोणते? तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता त्यावर चित्रांगदाने आम्ही शिवोपासक आहोत असे सांगितले. ।।१०८।। ज्याने केवळ आपल्या इच्छेने पुरुष आणि प्रकृती निर्माण केली, ज्याच्या लीलेने या ब्रह्मांडाचा लय होतो. ।।१०९।। जो पुन्हा स्वतःच्या इच्छेनेच पुनर्रचना घडवितो आणि शेवटी पंचमहातत्त्वांसह ती पुरूस प्रकृती ज्यात लीन होते. ।।११०।।

मग दोघे एकप्रीतीं । आदिपुरुषांमाजी सामावती ॥ तो सदाशिव निश्चितीं।। आम्हीं भजतो व्यातें ॥१११॥ ज्याच्या मायेपासून ।। झालें हे त्रिमूर्ति त्रिगुण ॥ त्या सत्त्वांशेंकरून ॥ विष्णु जेणें र्मिला ॥ ११२ ॥ रजांशें केलें विरंचीस ।। तमांशें रुद्र तामस ॥ तो शिव पुराणपुरुष ।। आम्ही भजतों र्वदा ॥ ११३ ॥ पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन ।। पंचतत्त्व सरिता मेदिनीवसन ।। भस्म लोष्ट अष्टधातु पून ॥ उरला तो शिव भजतों आम्ही ॥११४॥ अष्टादश वनस्पती सर्व बीजें ॥ आकारा आलीं जें ।। व्यापिलें जेणें कैलासराजें ।। त्याचें उपासक आम्ही असों ॥११५॥ ज्याचें नेत्र सूर्य जाण ॥ हेणीवर ज्याचें मन ।। रमारमण ज्याचें अंतःकरण ।। बुद्धि द्रुहिण जयाची ॥११६॥ अहंकार ज्याचा ।। पाणी जयाचें पुरंदर ।। कृतांत दाढा तीव्र ।। विराटपुरुष सर्वहीं जो ॥ ११७ ॥ एवं जितुकें देवताचक्र।। शिवाचें अवयव समग्र ।। एकादश रुद्र द्वादश मित्र ॥ उभे त्यापुढें कर जोडूनी ॥११८॥ ऐसें ज्याचे अपार ।। मी काय वर्णं मानव पामर ।। त्याच्या दासांचे दास किंकर ।। आम्ही असों चपात्मजा ।॥११९॥

ज्याच्यात ती पुरुष आणि प्रकृती सामावलेली आहे त्या अर्धनारीनटेश्वरास आम्ही भजतो, असे चित्रांगदाने तक्षकास सांगितले. ।।१११।। ज्याच्या मायेने त्रिगुणात्मक देवता निर्माण झाल्या आहेत, ज्याच्या सत्त्वगुणापासून विष्णूची उत्पत्ती झाली आहे. ।।११२।। ज्याच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून रुद्र निर्माण झाले आहेत, त्या श्री पुराण पुरुषाचे अर्थात श्री शिवाचे आम्ही उपासक आहोत. ॥११३॥ अंतरिक्ष त्रिभुवने, पंचतत्त्वे, सागर सरिता, माती, भस्म आणि अष्ठधातू रूपांनी जो व्यापलेला आहे त्या शिवाची आम्ही मनापासून भक्ती करतो. ।।११४।। अठरा प्रकारच्या वनस्पती, सर्व बीजे, विविध आकार हे सारे ज्याने आपल्या अस्तित्वाने व्यापून टाकले आहेत त्या सदाशिवाची आम्ही पूजा करतो. ।।११५॥ सूर्य याचा डोळा आहे, चंद्र हे ज्याचे मन आहे, ज्याच्या अंतरंगात श्रीहरीचा नित्य निवास आहे, ज्याच्या बुद्धीत ब्रह्मदेवाचे अधिष्ठान आहे असा हा देवांचाही देव महादेव आहे. ||११६|| ज्याचा अहंकार हा रुद्र आहे, ज्याचे हात हे इंद्राचे प्रतीक आहे, ज्याच्या विक्राळ दाढा या यमराजाप्रमाणे भयानक आहेत, अशा त्या विराट पुरुषास आम्ही वंदन करतो. ।।११७|| एकूणच सर्व देवदेवता ह्या ज्याच्यापासून उत्पन्न झाल्या आहेत; अकरा रुद्र, बारा आदित्य हे ज्याच्यासमोर नित्य कर जोडून उभे राहतात. ।।११८।। अशा त्या अनंत गुणसंपन्न देवाचे वर्णन ते मी पामराने काय आणि कोणत्या शब्दात करावे? हे कश्यपात्मज तक्षका, आम्ही तर फक्त त्यांच्या दासांचे दास आहोत. ।।११९।।

ऐसें वचन ऐकूनि सतेज ।। परम संतोषला दंदशूकराज ।। क्षेमालिंगन देऊनि कद्रुतनुज ।। नाना कौतुकें दाखवी तया ।॥१२०॥ म्हणे देवास जे दुर्लभ दुर्लभ वस्त ॥ ते तेथें आहे समस्त ।। तूं मज आवडसी बहुत ।। राहावें स्वस्थ मजपासीं ॥ १२१ ॥ चित्रांगद म्हणे महाराजा ॥ शिवकर्णभूषणा सतेजा ।। जननी-जनकांसी वेध माझा ।। एवढाच मी पोटीं तयांच्या ॥ १२२ ॥ चौदा वर्षांची सीमंतिनी ।। गुणनिधान लावण्यखाणी ॥ प्राण देईल ते नितंबिनी ।। बोलतां नयनीं अश्रू आले ॥ १२३ ॥ मातापितयांचें चरण ।। खंती वाटते कधीं पाहीन ।। माझी माता मजविण कष्टी जाण ॥ नेत्रीं प्राण उरला असे ॥ १२४ ॥ तरी मज घालवीं नेऊन ।। म्हणोनि धरिले नागेंद्राचे चरण ।। तक्षक होऊनि प्रसन्न ।। देत अपार वस्तूंतें ॥ १२५ ॥ म्हणे द्वादशसहस्र नागांचे बळ ॥ दिधलें तुज होईल सुफळ ॥ तैसाचि झाला तत्काळ ॥ चित्रांगद वीर तो ॥ १२६ ॥ तूं करशील जेव्हां स्मरण ।। तेव्हां तुज संकटीं पावेन ॥ मनोवेग वारू आणून ॥ चिंतामणी सवें दिधला ।। १२७ ।।

चित्रांगदाच्या मुखातून झालेली ती शिवस्तुती ऐकून तक्षकराजास मोठा संतोष झाला. त्या कद्रुतनुजाने उभे राहून पुढे येत मोठ्या आदराने चित्रांगद राजास प्रेममिठी घातली. ।। १२० ।। त्यानंतर तक्षक चित्रांगदास म्हणाला, “हे शिवोपासका, तू मला अत्यंत प्रिय झाला आहेस. तू इथे आनंदाने राहा. इथे तुला ज्या देवदेवतांनाही दुर्लभ आहेत अशा वसूंचा उपभोग मिळेल”. ।।१२१।। तेव्हा चित्रांगद राजा विनम्रपणे म्हणाला, ‘हे तक्षकराज, तू शिवाचे भूषण आहेस. तुझी विनवणी मला मान्यही आहे, पण अरे तिकडे माझे मातापिता एकटे आहेत. मी त्यांचा एकुलता एक पुत्र आहे. ।।१२२।। तिकडे माझी नूतन पाणिग्रहण झालेली सीमंतिनी ही प्राणप्रिया आहे. माझ्या वियोगाने ती प्राणत्याग करेल,” असे बोलताना चित्रांगदाचे डोळे पाणावले. ।।१२३।। दाटलेल्या कंठांनी तो पुढे म्हणाला, “मला माझ्या आई-वडिलांना कधी एकदा भेटेन, त्यांना कधी पाहीन असे झाले आहे. ते माझ्या वियोगाने अत्यंत दुःखीकष्टी झाले असतील. मला पाहायला त्यांचे प्राण पार डोळ्यात गोळा झाले असतील.” ।।१२४।। म्हणून हे तक्षकराजा, माझी तुला हीच विनंती आहे की, मला परत नेऊन सोड. असे म्हणून चित्रांगदाने तक्षकराजाचे पाय धरले. ।।१२५।। तेव्हा प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्यास मोठ्या प्रेमाने परवानगी तर दिलीच त्याबरोबरच अनेक वस्तू भेट दिल्या. ।। त्याचे मस्तकावर हात ठेवीत तक्षक त्यास म्हणाला, हे शिवभक्ता, मी तुला बारा हजार नागांचे बळ दिले आहे. ते तुला सर्वतोपरीने सबळ करेल. ।।१२६।। हे राजा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या मदतीस धावून येईन. ।।१२७।।

दुर्लभ रत्नें भूमंडळीं ।॥ देत अमूल्य तेजागळीं ।। पर्वताकार मोट बांधिली ।। शिरीं दिधली राक्षसांच्या ॥ १२८ ॥ देत दिव्य वस्त्रे अलंकार ॥ सवें एक दिधला फणिवर ॥ मनोवेगें यमुनातीर ।। क्रमूनि बाहेर निघाला ॥ १२९ ॥ झाले तीन संवत्सर । चहूंकडे पाहे राजपुत्र ।। तेच समयीं सीमंतिनी स्नानासी सत्वर ।। कालिंदीतीरा पातली ॥ १३० ॥ एकाकडे एक पाहती ।। आश्चर्य वाटे ओळख न देती ।। दिव्यरत्नमंडित नृपति ॥ चित्रांगद दिसतसे ॥ १३१ ॥ फणिमस्तकीचीं मुक्तं सतेज विशेष ।। भुजेपर्यंत डोले अवतंस ।। गजमुक्तांच्या माळा राजस ।। गळां शोभती जयाच्या ।। १३२ ।। पाचा जडल्या कटिमेखलेवरी ।। तेणें हिरवी झाली धरित्री ।। मृगपशु धांवती एकसरी ।। नवें तृण वाढलें म्हणोनियां ॥१३३॥ मुक्ताफळें देखोनि तेजाळ ।। धांवतचि येती मराळ ।। देखोनि आरक्त रत्नांचे ढाळ ।। कीर धांवती भक्षावया ॥ १३४ ॥ अंगीं दिव्य चंदनसुगंध ।। देखोनि धांवती मिलिंद ।। दशदिशा व्यापिल्या सुबद्ध ॥ घ्राणदेवता तृप्त होती ॥ १३५ ॥ विस्मित झाली सीमंतिनी ॥ भ्रमचक्रीं पडली विचार मनीं ।। चित्रांगदही तटस्थ होऊनी ।। क्षणक्षणां न्याहाळीत ।। १३६ ।।

असे म्हणत तक्षकाने चित्रांगदास मनोवेगाने धावणारा एक दिव्य अश्व आणि चिंतामणी दिला. ।।१२८ ।। तसे त्याने चित्रांगदास अनेक वस्त्रालंकार, भूषणे दिली आणि त्यास निरोप दिला. त्याबरोबर चित्रांगद राजा हा त्वरित यमुनेच्या वर आला. ।।१२९।। एव्हाना जवळजवळ तीन वर्षांचा काळ मध्ये लोटला होता. यमुनेच्या जलातून वर येताच चित्रांगद सभोवतीच्या परिसराकडे मोठ्या कौतुकाने पाहू लागला. नेमकी त्याच वेळी सीमंतिनी ही तिथे स्नानासाठी म्हणून आली होती. ।।१३०।। जेव्हा त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले, पण त्यांनी परस्परांना ओळख दिली नाही. त्यावेळी चित्रांगद हा अंगीच्या दिव्य वस्त्रालंकारांनी अत्यंत सुंदर दिसत होता. ।।१३१।। त्याच्या नाग मस्तकावरील तेजस्वी मोती, गळ्यातले हातापर्यंत रुळणारे अलंकार, वक्षस्थळावरील गजमुक्त माळ्या ह्यांनी तो अधिकच दखुलून दिसत होता. ।।१३२।। त्याच्या कमर- पट्टयावरील पाचू रत्नांच्या प्रकाशाने धरित्री हरित झाली होती. हरीण आणि अन्य पशू हे त्यास गवत समजून तिथे धावत होते.।।१३३।। त्याच्या अंगावरील अलंकारातले मोती पाहून हंस धावत येत होते, तर रत्ने पाहून पोपटही तिथे येत होते. ।।१३४।। चित्रांगदाच्या अंगीचा सुवास हा मुंग्यांना आकर्षित करीत होता. त्या सुगंधाने अनेकांच्या घ्राणदेवता तृप्त होत होत्या. ।।१३५।। अशा त्या दिव्य पुरुषाससमोर पाहून सीमंतिनी ही भ्रमात पडली की, हा पुरुष नेमका कोण असेल? तो असा तटस्थ होऊन आपल्याकडे का पाहतो आहे, त्यास परत परत पाहावे असे आपल्या मनासही का वाटते आहे? ।।१३६॥

कंठभूषणें रहित मंगळसूत्र ।। हरिद्राकुंकुमविरहित वक्त्र ।। अंजनविवर्जित नेत्र ।। राजपुत्र पाहातसे ॥ १३७ ॥ न्याहाळितां तटस्थ स्वरूपासी ।। वाटती रंभा उर्वशी दासी ।। कुचकमंडलु यांसी ।। उपमा नाहीं द्यावया ।। १३८ ।। तप्तचामीकरवर्ण डोळस ।। चिंताक्रांत अंग झालें कृश ।। कीं चंद्रकळा राजस ।। ग्रहणकाळीं झांकोळती ॥ १३९ ॥ मग तियेपाशीं येऊन ।। पुसे साक्षेपें वर्तमान ॥ म्हणे तुं आहेस कोणाची कोण ॥ मुळापासून सर्व सांग ॥ १४०॥ मग आपुल्या जन्मापासून ।। सांगितलें चरित्र संपूर्ण ।। बोलतां आसुर्वे नयन ॥ भरूनियां चालिले ॥१४१॥ अश्रुधारा स्रवती खालत्या ।। लाविल्या पयोधरलिंगास गळत्या ।। दंत जियेचें बोलतां ।। नक्षत्रांऐसे लखलखती ।।१४२ ।। सीमंतिनीच्या सख्या चतुर ।। राजपुत्रा सांगती समाचार ।। तीन वर्षे झालीं इचा भ्रतार ।। बुडाला येथें यमुनाजळीं ।॥१४३ ।। इचीं सासूश्वशुर दोनी ।। शत्रूनीं घातलीं बंदिखानीं ।। हे शुभांगी लावण्यखाणी ।। ऐसीं गती इयेची ॥१४४॥ कंठ दाटला सद्गदित ॥ चित्रांगद खालीं पाहत ।। आरक्तरेखांकित नेत्र ।। वस्त्रं पुसीत वेळोवेळां ॥१४५॥

सीमांत्रिकीच्या गत्यात अलंकार होते, पण मंगळसूत्र नव्हते. तिच्या कपाळावर सौभाग्यालंकाराची खूण नव्हती. तिच्या सुंदर डोळ्यांत काजळ नव्हते, अशा त्या तिच्या रूपाकडे चित्रांगद पाहात होता. ॥१३७॥ चित्रांगद त्याही अवस्थेत मन मोहून घेणारे तिचे दैवी रूप पाहात होता, रंभा, उर्वशीदेखील तिच्यापुढे फिक्या होत्या. तिच्या स्तनास तर कशाचीच उपमा देता येण्यासारखी नव्हती. ।।१३८ ।। तिचे डोळे तप्त सुवर्णासारखे दिसत होते, तर तिची काया ही चिंताग्रहण लागल्यासारखी काळवंडलेली दिसत होती. ।।१३९॥ तिच्याकडे रोखून पाहात आणि पुढे येत चित्रांगद तिला म्हणाला, हे ललने, तू कोणाची कोण? ते सांग. ।।१४० ।। तेव्हा सीमंतिने आपल्या जन्मापासूनचा सारा इतिहास त्यास निवेदन केला. ते सांगताना तिचे डोळे भरून आले. ।।१४१॥ हा सारा वृत्तांत सांगताना तिचे डोळे पाझरत होते. तिचा ऊर भरून आला होता. ती बोलत असताना तिचे ओठ थरथरत होते आणि त्यातून शुभ वंतकळ्यांचे दर्शन घडत होते. ॥१४२॥ तेव्हा अचानक तिच्या चतुर सख्या पुढे आल्या आणि त्यांनी चित्रांगवास सांगितले की, ‘हे महापुरुषा, अरे एका नौकानयनाच्चा आनंद घेत असताना तिचा पती हा यमुनेत बुडाला रे.” ।।१४३॥ अरे, हिच्या सासू-सासऱ्यांना त्यांच्या शत्रूने त्यांचे राज्य हिरावून घेत बंदिशाळेत टाकले आहे. त्यामुळे आमच्या सखीची ही अशी दुःखितावस्था झाली आहे. ।।१४४।॥ तिची ही सर्व कहाणी ऐकून आता तर चित्रांगदाचेही नेत्र पाझरू लागले. त्याचाही कंठ वाटून आला. ।।१४५।।

सीमंतिनी सख्यांस सांगे खूण ॥ कोण कोठील पुसा वर्तमान ।। सख्या पुसती येणें कोठून ।। झालें खूण नाम सांगा ।।१४६ ॥ तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष ।। जातों चिंतिलिया ठायास ।। क्षणें स्वर्ग क्षणें पाताळास ।। गमन आमुचें त्रिलोकीं ॥१४७॥ कळतें भूत-भविष्य-वर्तमान ।। मग सीमंतिनीस हातीं धरून ॥ कानीं सांगे अमृतवचन ॥ भ्रतार तुझा जिवंत असे ॥१४८॥ आजि तीन दिवसां भेटवीन ॥ लटिकें नव्हे कदापि जाण ॥ श्रीसदाशिवाची आण ।। असत्य नव्हे कल्पांतीं ।।।१४९ ॥ सौभाग्यगंगे चातुर्यविलासिनी ॥ तुझें ऐश्वर्य चढेल येथूनि ॥ परी ही गोष्टी कोणालागुनी ।। दिवसत्रय प्रगटवू नको ॥ १५० ॥ ऐसें सांगोनि परमस्नेहें ।। येरी चोरदृष्टीं मुख पाहे ॥ म्हणे वाटतें चित्रांगद होये ।। ऐसें काय घडूं शके।। १५१ ॥ मृत्यू पावला तो येईल कैसा ॥ मग आठवी भवानीमहेशा । करुणाकरा पुराणपुरुषा ।। न कळे लीला अगम्य तुझी ॥१५२॥ हा परपुरुष जरी असता ॥ तरी मज कां हातीं धरिता ।। स्नेह उपजला माझिया चित्ता। परम आप्त वाटतसे ।।१५३ ॥

त्याच वेळी सीमंतिनीने हा कोण कुठला हे विचारा अशी त्यांना खूण केली. तेव्हा त्या चतुर सख्यांनी त्या पुरुषास त्याचीही माहिती विचारली. ।।१४६।। तेव्हा तो त्यांना म्हणाला, “हे पाहा मी एक सिद्ध पुरुष आहे. मी मनात आणल्याबरोबर त्रिलोकात कुठेही जाऊ शकतो. “।।१४७|| तसेच मला भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ज्ञान आहे, असे म्हणत तो पुरुष सीमंतिनीच्या कानाशी लागत तिला म्हणाला, ‘तुझा पती जिवंत आहे.’ ।।१४८।। “हे ललने, तू माझ्या शब्दावर विश्वास ठेव. मी पुढे तीन दिवसांनी तुझा पती तुला इथेच भेटवीन. माझी वाणी कधी असत्य होणार नाही. मला भगवान सदाशिवाची आण आहे.”।।१४९।। ” हे सुंदरी, तू सौभाग्यगंगा आहेस, तू चतुर विलासिनी आहेस, तुझे वैभव हे इथून पुढे सतत वृद्धिंगत होत जाणार आहे. फक्त तो ही गोष्ट कोणासही तीन दिवस सांगू नकोस.” ।।१५० ।। असे म्हणत तो तिच्या इतक्या जवळ आला की, त्यावेळी तिला तो चित्रांगदच नसेल कशावरून असंही क्षणभर वाटून गेले. पण हे कसे शक्य असणार? असे तिचे दुसरे मन तिला म्हणाले. ।।१५१।। खरंतर जो जीव एकदा मरण पावला आहे तो पुन्हा परत कसा येईल? पण हे सदाशिवा तुझा महिमा, तुझी लीला मात्र काय करेल हे सांगता येत नाही हेच खरं असा विचार करून ती शिवस्मरण करू लागली. ।।१५२।। जर हा कोणी अन्य परका पुरुष असता तर त्याने माझा हात का धरला असता? त्याच्या केवल पाहण्याने, त्याच्या बोलण्याने माझ्या मनात इतके प्रेम का बरे जागले असते? ।।१५३।।

काय प्राशूनि आला अमृत । कीं काळें गिळोनि उगळिला सत्य ॥ हे मदनांतक षडास्यतात ।। तुझें कर्तृत्व न कळे मज ॥ १५४ ॥ जगन्निवासा है करशील सत्य ।। तरी अकरा लक्ष पूजीन दांपत्य ।। तितुक्याच वाती यथार्थ ॥ बिल्वदळें अर्पीन ॥१५५॥ यावरी बोले राजपुत्र ॥ सुकुमारे सदनासी जाईं सत्वर ।। तुझी सासू आणि श्वशुर ।। त्यांसी सांगू जातों आतां ॥१५६ ॥ तुमचा पुत्र येतो म्हणोन ।। शुभ समाचार त्यांस सांगेन ।। येरी करूनि हास्यवदन । निजसदनाप्रति गेली ॥१५७॥ सख्या बोलती आण वाहून ।। तुझा भ्रतार होय पूर्ण ।। ऐसा पुरुष आहे कोण ॥ जो तुझा हात धरूं शके।। १५८ ।। तुझीं वचनें ऐकून ।। त्याच्या नेत्रीं आलें जीवन ।। सीमंतिनी म्हणे वर्तमान ।। फोडूं नका गे उग्या रहा ।।१५९ ।। सीमंतिनीच्या मुखकमळीं ।। सौभाग्यकळा दिसूं लागली ।। सुखासनारूढ सदना गेली ।। कोठें काहीं न बोले ॥१६० ॥ मनोवेगाच्या वारूवरी त्वरित ।। आरूढला सीमंतिनीकांत ।। निजनगराबाहेर उपवनांत ।। जाऊनियां उतरला ।। १६१ ।।

त्याने अमृत सेवन केले काया का या यमुना रूपी काळानेच त्यास गिळून पुन्हा परत बाहेर काढले आहे? काही कळत नाही. हे मदनांतका, हे कार्तिकेयाच्या ताता, तुझी अद्‌भुत किमया कळणे खरोखरच अगम्य आहे. ।।१४१॥ हे जगत्रिवासा, जर ही गोष्ट तू सत्य ठरवलीस तर अकरा लक्ष दांपत्यांना भोजन व तेवढ्याच वातींनी तुझी आरती आणि तेवढीच बिल्वपत्रे मी तुला अर्पण करीन, असे सीमंतिनी भगवान शिवास म्हणाली. ।॥१५६॥ सीमंतिनी हा असा विचार करीत असताना तो पुरुष तिला म्हणाला, हे सुकुमारे, आता तू सत्वर तुझ्या घरी परत जा. मलाही ही शुभवार्ता तुझ्या सासू-सासऱ्यांना द्यायला जायचे आहे. ।।१५६।। त्यांना हे सांगू दे की, तुमचा पुत्र येतो आहे. तेव्हा सुहास्य मुद्रेने आणि कसल्याशा आनळ्याच समाधानाने सीमंतिनी आपल्या घरी परतली. ॥१५७॥ तेव्हा तिच्या सख्या तिला म्हणू लागल्या की, अर्ग सीमंतिनी, तोच नक्की चित्रांगद असला पाहिजे. नाहीतर अन्य कोणी परका पुरुष तुझा हात धरण्याचे धाडस ते का करेल. ।।१५८।। अनं तुझे बोलणे ऐकून त्याच्याही डोळ्यांत पाणी आले होते है तू विसरलीस का? त्यावर ती आपल्या सख्यांना म्हणाली, “हे पाहा, साऱ्याजणी गप्प राहा. या बाबत आत्ताच कोणास काही बोलू नका. ।।१५९।। या प्रकाराने सीमंतिनीच्या मुखावर सुहास्य पसरले, ती सुखावली आणि घरी परतली; पण ती कोणास काही बोलली मात्र नाही. ।।१६०।। इकडे चित्रांगद हा मनोवारूवर आरूढ झाला आणि आपल्या स्वतःच्या नगरीबाहेरील एका उद्यानात जाऊन उतरला. ।।१६१।।

नागें मनुष्यवेष धरून ।। शत्रूस सांगे वर्तमान ।। द्वादशसहस्र नागांचे बळ घेऊन॥ चित्रांगद आला असे ॥ १६२ ।। तुम्ही कैसे वांचाल सत्य ।। तंव ते समस्त झाले भयभीत ।। येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ ।। सिंहासनीं स्थापा वेगीं ॥१६३॥ मग नाग जाऊन ॥ मातापितयांसी सांगे वर्तमान ।। त्यांसी आनंद झाला पूर्ण ।। त्रिभुवनांत न समाये ॥ १६४॥ तों शत्रु होवोनि शरणागत ।। उभयतांसी सिंहासनीं स्थापीत ।। दायाद कर जोडोनि समस्त ।। म्हणती आम्हां रक्षा सर्वस्वें ॥ १६५ ॥ मग सर्व दळभार सिद्ध करून ।। भेटीस निघाला इंद्रसेन ।। वाद्यनादें संपूर्ण ॥ भूमंडळ डळमळी ॥१६६।। माता पिता देखोन ॥ सप्रेम धांवे चित्रांगद सुजाण ॥ धरूनि पितयाचें चरण ।। क्षेमालिंगनीं मिसळला ॥१६७॥ मग लावण्यवती धांवत ।। चित्रांगदाच्या गळां मिठी घालीत ॥ जैसा कौसल्येसी रघुनाथ ।। चतुर्दश वर्षांनंतरें ।। १६८ ।। हारपलें रत्न सांपडलें । कीं जन्मांधासी नेत्र आलें । कीं प्राण जातां पडलें ।॥ मुखामाजी अमृत ॥१६९ ।। करभार घेऊनि अमूप ।। धांवती देशोदेशींचे भूप ।। पौरजनांचे भार समीप ।॥ येऊनियां भेटती ॥१७० ॥

त्याने एका नागपुरुषास नगरीत पाठविले. त्या नागपुरुषाने तेथील राजास चित्रांगद हा बारा हजार नागांचे बळ घेऊन आला आहे असे सांगितले. ।।१६२।। आता तुमचे रक्षण कोण करणार? नागपुरुषाचे ते बोलणे ऐकून शत्रू भयभीत झाला. त्याने शरणागतीचा मार्ग निवडला. तेव्हा नागपुरुषाने पुनश्च इंद्रसेनास सिंहासनावर बसवा असे त्यांना सांगितले. ।।१६३।। मग नागराजाने चित्रांगदाच्या मातापित्यास ती शुभवार्ता दिली. त्यामुळे त्यांना अपूर्व असा त्रिभुवनात मावेना इतका आनंद झाला. ।।१६४।। पुढे शत्रू शरण आले. त्यांनी चित्रांगदाचे पित्यास राज्यासनी बसविले. ते आपल्या प्राणरक्षणासाठी दयेची भीक मागू लागले. ।।१६५।। जेव्हा आपली सर्व सेना सज्ज करून इंद्रसेन हा पुत्रभेटीस निघाला तेव्हा सर्वत्र वाद्यांचा गजर होऊ लागला. त्या आवाजाने भूमंडळ दणाणून गेले. ।।१६६|| आपल्या मातापित्यास समोर पाहून चित्रांगद धावत पुढे गेला. त्याने पित्यांचे पदवंदन केले. त्यांनी पुत्रास मोठ्या प्रेमाने छातीशी कवटाळले. ।।१६७|| मागोमाग त्याची माता पुढे आली. तिने पुत्रास प्रेममिठीत घेतले. चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून परत आलेल्या रामाने कौसल्यामातेस जशी मिठी घातली तशी ती मिठी होती. ।।१६८ ।। हरविलेले रत्न सापडल्याचा, जन्मांधास दृष्टिलाभ झाल्याचा किंवा मरणोन्मुखी असताना मुखी अमृत पडावे तसा तो आनंद होता. ।।१६९।। चित्रांगद परत आल्यावर सर्व राजे आपापला करभार घेऊन आले. नगरीतले अनेक लोक त्याच्या भेटीस येऊ लागले. ।।१७०।।

हनुमंतें आणिला गिरिद्रोण ।। जेवीं उठविला ऊर्मिलारमण ।। आनंदमय झालें त्रिभुवन ।। तैसेंचि पूर्ण पैं झालें ॥१७१ ॥ मातापितयांसमवेत ।। चित्रांगद चालिला मिरवत ।। नैषधपुर समस्त ॥ शृंगारिलें तेधवां ।। १७२ ।। चित्रवर्त्यासी सांगावया समाचार ॥ धांवताती सेवकभार ।। महाद्वारीं येतां साचार ।। मात फुटली चहूंकडे ॥१७३ ।। हेर जाऊनि रायास वंदीत ।। उठा जी तुमचे आले जामात ।। राव गजबजिला धांवत ।। नयनीं लोटत आनंदाश्रु ।।१७४ ।। कंठ झाला सद्‌गदित ।। रोमांच अंगीं उभे ठाकत ।। समाचार आणिला त्यांसी आलिंगीत ।। धन वस्त्रं देत सीमेहूनी ॥१७५॥ अपार भरूनि रथ ॥ शर्करा नगरांत वांटीत ।। मंगळतुरें अद्भुत ।। वाजों लागलीं एकसरें ॥ १७६ ॥ धांवले अपार भूसुर ।। रायें कोश दाविले समग्र ।। आवडे तितुकें धन न्यावें सत्वर ।। सुखासी पार नाहीं माझ्या ।। १७७ ।। जय जय शिव उमानाथ ।। म्हणोनि राव उडत नाचत ।। उपायनें घेऊनि धांवत ।। प्रजाजन नगरींचें ॥ १७८ ॥ सीमंतिनीसी बोलावून ।। दिव्य अलंकार लेववून ।। जयजयकार करून ।। मंगळसूत्र बांधिलें ।॥ ७९ ॥ दिव्य कुंकुम नेत्रीं अंजन ।। हरिद्रा सुमनहार चंदन ।। सौभाग्य लेववित्ती जाण ॥ त्रयोदशगुणी विडे देती ॥१८०॥

ज्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत आणून लक्ष्मणास पुन्हा जिवंत केल्यावर जसा वानरसेनेस अपूर्व आनंद झाला तसाच आनंद चित्रांगदास पाहून नगरजनांना होत होता. ।।१७१।। शृंगारलेल्या नगरीतून चित्रांगदास त्याच्या मात्यापित्यासह वाजतगाजत, मिरवत राजवाड्यात आणले जात होते. ।।१७२।। तिकडे चित्रवर्त्यासही त्यांचा जामात परत आल्याची शुभवार्ता देण्यासाठी एक खास दुत तिकडे धावत गेला. त्याच्या आगमनाबरोबरच ती शुभवार्ता अवघ्या नगरीत पसरली. ।।१७३।। दूताने त्या राजास ती वार्ता देताच राजाचे नेत्र आनंदाश्रृंनी भरून आले. ।।१७४।। त्याचा कंठ दाटून आला. काया रोमांचित झाली. त्याने त्या दूताचा वस्रालंकार देऊन मोठा सन्मान केला. ।।१७५।। अवघ्या नगरीत मंगल वाद्ये वाजू लागली. या शुभवार्तेबरोबरच नगरात हत्तीवरून साखर वाटण्यात आली. ।।१७६।। राजाच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने येणाऱ्या प्रत्येकास आपले धनभांडार खुले करून दिले. ।।१७७|| जय जय शिवशंकर अशा गर्जाना उडू लागल्या. राजा आनंदाने शिवनाम गर्जनेत दंग झाला. तो अपार वस्रलंकार धनाची उधळण करू लागला. ।।१७८ ।। या शुभवार्तेबरोबरच सीमंतिनीस मंगलस्नान घालून, वस्त्रालंकार घालून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले. सर्वत्र तिच्या शिण्याभक्तीचा जयजयकार होऊ लागला. ।।१७९।। तिला सर्व सौभाग्य अलंकारांनी नटवून तिच्या डोळ्यांत काजळ घातले. केसात गजरे माळले. गळ्यात पुष्पहार घातले. तिला त्रयोदशगुणी विडा दिला. ।।१८०।।

एक शृंगार सांवरिती ।। एक पीकपात्र पुढें करिती ।। नगरींच्या नारी धांवती ।। सीमंतिनीसी पाहावया ।।१८१ ।। माता धांवली सद्गदित ।। सीमंतिनीसी हृदयीं धरीत ।। माये तुझा सौभाग्यसिंधु वर्धत ।। असंभाव्य उचंबळला ॥ १८२ ॥ ऐश्वर्यद्रुम गेला तुटोन ।। पुढती विरूढला भेदीत गगन ।। तुझी सौभाग्यगंगा भरून ।। अक्षय चालिली उतरेना ॥ १८३ ॥ धन्य धन्य सोमवारव्रत ।। अकरा लक्ष पूजिलीं दांपत्य ।। जितवन करावयास जामात ।। बोलावू धाडिलें त्वरेनें ॥ १८४ ॥ मातापितयांसमवेत ।। चित्रांगद नगरा येत । चित्रवर्मा नृपति त्वरित ।। सामोरा येत तयासी ।।१८५ ॥ जामाताच्या कंठीं ।। धांवोनि श्वशुरें घातली मिठी ।। ब्रह्मानंदें भरली सृष्टी ।। पुष्पवृष्टी करिती देव ॥८६ ॥ नगरामाजी आणिलीं मिरवत ।। पुनः विवाह केला अद्भुत ।। मग एकांतीं चित्रांगद नृपनाथ ।। बोलावीत सीमंतिनीसी ॥ १८७ ॥ पाताळींचे अलंकार अद्भुत ।। सीमंतिनीलागीं लेववीत ॥ नवरत्नप्रभा फांकली अमित ।। पाहतां तटस्थ नारीनर ।।१८८ ।।

तिच्या दास-दासी तिचा साजशृंगार करीत होत्या, तर कोणी तिच्या मागेपुढे झुलत होत्या. पुन्हा सौभाग्य अलंकारांनी सजलेल्या सीमंतिनीला पाहायला नगरवासीयांनी एकच गर्दी केली होती. ।। १८१।। सीमंतिनीची आई तर इतकी सद्गदित झाली होती की, ती तिला कौतुकाने पुन्हा पुन्हा कवटाळत होती. ती म्हणत होती की, “बाळे, तू खरोखरच पुण्यवान, भाग्यवान आहेस. तुझा सौभाग्यसागर हा अनपेक्षितपणे उचंबळला आहे.”।।१८२॥ एखादा वृक्ष छाटल्यावर जसा जोमाने वाढतो, तसा तुझा ऐश्वर्यवृक्ष आता अधिक जोराने फुलणार आहे. तुझी अक्षय सौभाग्यगंगा ही खळाळून वाहणार आहे. ।।१८३।। हा सारा तू निष्ठेने आचरत असलेल्या शिवव्रताचा महिमा आहे. तू अकरा लक्ष दांपत्यांना जेऊ घालत होतीस ना? त्याचेच हे फलित, असे म्हणून त्या राजाराणीने जामातास सन्मानाने बोलावून घेतले ।।१८४|| तो सासऱ्यांचा निरोप मिळताच चित्रांगद हा आपल्या मातापित्यासह आणि राजवैभवासह सीमंतिनीकडे आला, तेव्हा त्यास राजा सामोरा गेला. ।।१८५|| सासऱ्याने पुढे जाऊन जावयाच्या गळ्यास प्रेममिठी घातली. पती-पत्नीची पुनर्भेट घडवून आणण्यात आली, तेव्हा देवदेवता पुष्पवृष्टी करू लागल्या. ।।१८६।। राजा चित्रवर्याने त्या दोघांना वाजतगाजत आपल्या नगरीत नेले. तिथे पुनश्च त्यांचा मंगल विवाह विधी संपन्न करण्यात आला. त्यानंतर चित्रांगदाने सीमंतिनीची एकांतात भेट घेतली. ।।१८७।। त्याने तक्षक राजांनी तिच्यासाठी दिलेले दिव्य अलंकार तिला दिले. त्या अलंकारांच्या रत्नांच्या दिव्य तेजाने तिची कांती अधिकच उजळली. सारेजण तिच्याकडे मोठ्या विस्मयित नजरेने पाहू लागले.।।१८८।।

पाताळींचा सुगंधराज निगुती ।। आत्महस्तें लेववी सीमंतिनीप्रती ।। नाना वस्तु अपूर्व क्षितीं ।। श्वशुरालागीं दीधल्या ॥१८९॥ सासूश्वशुरांच्या चरणीं ।॥ मस्तक ठेवी सीमंतिनी ।। माये तुझा सौभाग्योदधि उचंबळोनी ।। भरला असो बहु काळ ॥१९० ।। पुत्र सीमंतिनीसहित ।। इंद्रसेन नैषधपुरा जात ।। अवनीचे राजे मिळोनि समस्त ।। छत्र देत चित्रांगदा ।। १९१ ।। समस्त राज्यभार समर्पून ।। तपासी गेला इंद्रसेन ।। तेथें करूनिया शिवार्चन ॥ शिवपदासी पावला ॥१९२॥ आठ पुत्र पितया-समान ।। सीमंतिनीसी झाले जाण ॥ दहा सहस्र वर्षे निर्विघ्न ।। राज्य केलें नैषधपुरीं ॥ १९३ ॥ जैसा पितामह नळराज ।। परम पुण्यश्लोक तेजः पुंज ।। तैसाचि चित्रांगद भूभुज ।। न्यायनीतीं वर्ततसे ।।१९४ ।। शिवरात्रि सोमवार प्रदोषव्रत ।। सीमंतिनी चढतें करीत ।। तिची ख्याति अद्भुत ।। सूत सांगे शौनकादिकां ॥१९५॥ हें सीमंतिनीआख्यान सुरस ।। ऐकतां सौभाग्यवर्धन स्त्रियांस ।। अंतरला भ्रतार बहुत दिवस ॥ तो भेटेल परतोनी ।। १९६ ।।

पाताळ नगरीतून आणलेले सुगंधी अत्तर त्याने सीमंतिनीच्या अंगास लावले. तसेच तक्षकाकडून भेटीच्या स्वरूपात मिळालेल्या अनेक अपूर्व अशा वस्तू चित्रांगदाने आपल्या सासू-सासऱ्यांना भेट दिल्या. ।।१८९|| सीमंतिनीने जेव्हा आपल्या सासू-सासऱ्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले, तेव्हा तिला मोठ्या प्रेमाने जवळ घेत तिची सासू म्हणाली, “बाळे, तू खरोखरच भाग्यवान, पुण्यवान आहेस. तुझा हा सौभाग्य सागर असाच सदैव भरून राहू दे.”।।१९०|| त्यानंतर राजा इंद्रसेन हा आपल्या मुलास आणि सुनेस मोठ्या सन्मानाने आपल्या नगरात घेऊन गेला. तेव्हा तिथे पृथ्वीवरील अनेक राजे गोळा झाले. त्यांनी चित्रांगदावर छत्र धरले. ।।१९१।। नंतर आपला सर्व राज्यकारभार हा पुत्राचे हाती सोपवून इंद्रसेन राजा तपाचरणासाठी घोर वनात निघून गेला, तिथे तपसाधना करून तोशिवपदास गेला. ||१९२|| कालांतराने सीमंतिनीस पित्याप्रमाणे आठ पुत्र झाले. त्यांनी पुढे हजारो वर्षे सुखाने राज्य केले. ।।१९३।। चित्रांगद राजा हा आपल्या आजोबांसारखाच म्हणजे नळ राजासारखा पुण्यवान अन् तेजस्वी होता. त्याने पुढे कुशलतेने आणि न्यायनीतीने अनेक वर्षे सुखाने राज्यकारभार केला. ।। १९४।। सीमंतिनी ही शिवरात्र, सोमवार आणि प्रदोष पूजेचे व्रत अशी व्रते चढत्या क्रमाने करीत असल्यानेच तिच्या भाग्याचा सूर्य अधिकच तळपू लागला. तिचे हे अद्भुत असे आख्यान सूतांनी शौनकादिक ऋषिवरांना सांगितले. ।।१९५।। श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की, हे सीमंतिनीचे आख्यान ज्या स्त्रिया श्रद्धेने वाचतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल. तसेच बऱ्याच दिवसांपासून दूर गेलेल्या पतीची भेट घडेल. ।।१९६।।

विगतधवा ऐकती ।। त्या जन्मांतरीं दिव्य भ्रतार पावती ।। शिवचरणीं धरावी प्रीती ।। सोमवारव्रत न सोडावें ॥ १९७ ॥ ऐसें ऐकतां आख्यान ।। अंतरला पुत्र भेटेल मागुतेन ।। आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।। होय ज्ञान विद्या बहु ॥१९८॥ गंडांतरें मृत्यु निरसोनि जाय ।। गतधन प्राप्त शत्रुपराजय ।। श्रवणें पठणें सर्व कार्य ।। पावे सिद्धी येणेचि ॥ १९९ ॥ सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण ।। भक्तिमाघमासीं करितां स्नान ।। त्रिविध दोष जाती जळोन ॥ शिवपद प्राप्त शेवटीं ॥ २०० ॥ सीमंतिनीआख्यान सुधारस । प्राशन करिती सज्जनत्रिदश ।। निंदक असुर तामस ।। अहंकारमद्य सेविती ॥२०१ ॥ अपर्णाहृदयारविंदमिलिंद ।। श्रीधरस्वामी पूर्ण ब्रह्मानंद ॥ अभंग अक्षय अभेद ॥ न चळे न ढळे कदाही ॥२०२॥ श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ षष्ठाध्याय गोड हा ॥२०३॥

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

ज्या विधवा स्त्रिया या आख्यानाचे पठण करतील त्यांना पुढील जन्मी दिव्य पती लाभेल. मात्र त्यांनी शिवाचे व्रत, उपासना ही सोडता कामा नये.।।।१९७|| या अध्यायाचे श्रवण केले असता अंतरलेल्या पुत्राची पुनर्भेट होते. आरोग्य, आयुष्य याची वृद्धी होते. ज्ञानवृद्धी होते. ।।१९८।। तसेच गंडांतर, अपमृत्यू टळणे, हरवलेले धन परत सापडणे, शत्रूचा पराजय होणे, सर्व कार्यात यश लाभणे अशी फलिते प्राप्त होतात. ।।१९९।। या सीमंतिनी रूपी अध्यायाच्या पवित्र प्रयाग क्षेत्रात भक्तिगंगेचे स्नान केले असता सर्व प्रकारची पापे जळून जातात. त्रिविध प्रकारचे ताप दूर होतात. तसेच उपासकास अंती शिवपदाची प्राप्ती होते. ||२००।। या सीमंतिनी अध्यायरूपी अमृताचे पान हे देवदेवता, सज्जन भक्त आणि भाविकच करतात. अभक्तांना मात्र मद्यपानच गोड लागते. ||२०१।। पार्वतीचा हृदयनाथ हा श्रीधराचा स्वामी असून, तो पूर्ण ब्रह्मानंदरूप आहे. तो अभंग, अक्षय, भेदरहित आणि अचल, अढळ असा आहे. ।।२०२|| स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृताचा हा सहावा अध्याय सकल शिव भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने श्रवण करोत. ।।२०३।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Pachava

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Sahava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top